संगमनेर । नगर सहयाद्री:-
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची बाजारपेठ फुलली आहे. प्रामाणिकपणा हे आपल्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य राहिले आहे. शहर व तालुक्याच्या विकासात व्यापाऱ्यांचे योगदान आहे. एखादा चुकत असेल तर सांगा .मात्र गुणवत्तेच्या नावाखाली व्यापाऱ्यांना त्रास देणे ही संगमनेर तालुक्याची संस्कृती नाही. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने व्यापाऱ्यांना कुणीही त्रास देऊ नका असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.
इंदिरानगर येथील निवासस्थानी संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आमदार सत्यजित तांबे यांना शहर मधील व्यापाऱ्यांनी विविध अडचणींबाबत व अपप्रचार आणि त्रास देणाऱ्यांबाबत निवेदन दिले. यावेळी उद्योगपती राजेश मालपाणी, अध्यक्ष योगेश कासट, ओंकार शेठ भंडारी, सुमेध संत, शरद गांडोळे ,अरुण शहरकर, जुगल किशोर बाहेती, प्रकाश राठी, मकरंद राहतेकर, संतोष कारले, गुरुनाथ बापते, मुकेश कोठारी, शैलेश मालानी, विलास दिवटे, विश्वनाथ असावा, विशाल पडतानी, अभय नेहुलकर ,गुलाब शहा, रुपेश राहतेकर , निखिल गुंजाळ आदींसह विविध व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्या विविध समस्यांचे निवेदन आमदार सत्यजित तांबे यांना दिले. संगमनेर शहरातील गुळ पॅकिंग व अन्य व्यावसायिकांच्या विषयी काही लोक अपप्रचार करून संगमनेर मधील व्यापाऱ्यांची बदनामी करत आहेत. सदर गुळाचे नमुने हे अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगर यांच्याकडून तपासणी करून घेतले असून हा गूळ प्रामाणिक झाल्याचे सिद्ध सुद्धा झाले आहे. मात्र तरीही काही लोक व्यक्तिगत स्वार्थासाठी व्यापाऱ्यांना त्रास देत असल्याने समस्त व्यापाऱ्यांनी आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेतली.
यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, शहराच्या व तालुक्याच्या विकासात व्यापारी बांधवांनी योगदान दिले आहे. मागील काही काळापासून क्वालिटीच्या नावाखाली काही मंडळी व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. जे प्रामाणिक काम करत असतील त्यांना चुकीच्या मार्गाने त्रास देणे अडचणीत आणणे हे अत्यंत दुर्दैवी आहे .
एखादा व्यापारी चुकत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. परंतु चूक नसताना व्यक्तिगत स्वार्थासाठी विनाकारण त्रास काही मंडळी देत आहेत. त्यांना कधीही पाठीशी घालणार नाही. याचबरोबर सदर मालाची तपासणी शासकीय यंत्रणा करत असते .त्यांच्या कडून प्राप्त झालेल्या अहवालावरही संशय व्यक्त करणे आणि त्रास देणे हे अत्यंत चुकीचे आहे. व्यापारी बांधवांनी प्रामाणिकपणाच्या मार्गाने एकजुटीने लढावे आपण व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहोत असे ते म्हणाले.
तर राजेश मालपाणी म्हणाले की ठराविक काही लोक मुद्दाम व्यापाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी खोटेनाटे कागदपत्र करून ब्लॅकमेल करत आहेत .याविरुद्ध सर्वांनी आमदार सत्यजित तांबे व प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. आमदार तांबे यांनी याबाबत व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे अस्वस्थ केले असून कुणी चुकीच्या मार्गाने त्रास देतच असेल तर सर्व व्यापारी एकत्र येऊन अशा प्रवृत्ती विरुद्ध लढा देतील असे ते म्हणाले. तर यावेळी जमलेल्या विविध व्यापाऱ्यांनी संगमनेर शहरांमध्ये सध्या असलेल्या अशांतता आणि असुरक्षित याबाबत चिंता व्यक्त केली यापूर्वी असे वातावरण कधीही नव्हते असेही अनेक व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.