पुणे। नगर सह्याद्री
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या ८६व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वात शोककळा पसरली आहे. सहजसोप्या भाषेत वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगणाऱ्या नारळीकरांनी ‘व्हायरस’, ‘यक्षांची देणगी’ यांसारखी पुस्तके लिहिली जी खूप गाजली होती.
नारळीकर यांच्या जाण्याने वैज्ञानिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापुरात झाला. केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. मिळवणारे नारळीकर यांनी विश्वरचनाशास्त्र आणि सापेक्षतावादावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ फ्रेड हॉईल यांच्यासोबत ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडला. टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) आणि आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र केंद्रात (IUCAA) त्यांनी मोलाचे योगदान दिले.
विज्ञानप्रसारासाठी त्यांनी मराठीतूनही अनेक पुस्तके लिहिली. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याने भारतीय खगोलशास्त्राला जागतिक स्तरावर मान मिळवून दिला आहे. डॉ. जयंत नारळीकर यांनी सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण आणि विश्वाच्या उत्पत्तीवर संशोधन केले आहे.