मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, केरळपासून दक्षिण गुजरातपर्यंत मान्सून ढगांची साखळी सक्रिय झाली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तासांमध्ये परभणी, नांदेड, तसेच मराठवाडा व विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे आणि उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा इशारा दिला गेला आहे. गेल्या २४ तासांत मराठवाड्यातील ६५ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे घाट परिसरात देखील पावसाचे तीव्र अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. दडी मारलेल्या पावसाने पुन्हा उसळी मारली. राज्यातील काही भागात पुन्हा रिपरिप सुरू झाली आहे. यामुळे खरिप हंगामातील अर्धवट राहिलेली पेरणी गती घेण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे, ज्याचा प्रभाव मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पावसावर पडणार आहे. हवामान विभागाने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.