अहिल्यानगर| नगर सह्याद्री
जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. पोलिसांनी आता अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारची दबंगगिरी न करता गुन्हेगारांवर वचक निर्माण करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, गुन्हेगारांची गय केली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मांडली.
सोमवारी (२ जून) पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे उपस्थित होते.पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले की, सराईत गुन्हेगारांविरूध्द कडक कारवाई करण्यासाठी एमपीडीए आणि तडीपारीची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाईल. सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी गस्त वाढवली जाईल. गावठी शस्त्रांचा शोध, महिलाविषयक गुन्ह्यांचे अन्वेषण, आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.महापालिका, आरटीओ यांच्याशी समन्वय साधून वाहतूक सुरळीत करण्याचे नियोजन आहे. आर्थिक गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
विशेषतः पतसंस्थांमधील गैरव्यवहारामुळे गुंतवणूकदारांना होणार्या नुकसानीला आळा घालण्यासाठी, या विषयात रस असलेल्या कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा ठाम अंमल करून जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षितता आणि शांततेचा विश्वास देण्याच्या दृष्टीने काम केले जाईल असे अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरी असल्याच्या पार्श्वभूमीवर, पोलीस ठाण्यांच्या दहशतवाद विरोधी कक्षातील अधिकार्यांची विशेष बैठक घेण्यात आली असून, त्यांना या घुसखोरांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाजमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही मोहीम राबवली जाणार असल्याचेही अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले.
गोवंश हत्या सहन केली जाणार नाही
गोवंश हत्या कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, अशा कठोर शब्दांत अधीक्षक घार्गे यांनी आपली भूमिका मांडली. संबंधित अधिकार्यांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जातीय तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही पोलीस दलाला देण्यात आले आहेत. अहिल्यानगर शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये वाहतूक शाखेतील मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे.