इनसाईड स्टोरी : स्व. अरुणकाकांसह संग्राम जगताप यांच्या राजकीय वाटचालीत मुस्लिम मतपेढी कधी निर्णायक होती का?
सारिपाट / शिवाजी शिर्के:-
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी सुजय विखे पाटलांना नाकारले. विधानसभा निवडणुकीत हे मतदार काही प्रमाणात का होईना आपल्यासोबत राहतील अशी धारणा राहिलेल्या संग्राम जगताप यांच्याबाबतही सुजय विखेंच्या आकड्यांची पुनरावृत्ती झाली. विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि मतांचे प्रभागनिहाय आकडे समोर येताच संग्राम जगताप यांचा नूर पालटला. मोठा विजय मिळाला असतानाही त्यांनी अगदी ठरवून प्रखर हिंदुत्वावादी नेत्याची भूमिका घेतली आणि संधी मिळेल तिथे हिंदुत्वाची टोकाची भूमिका मांडली. कोणत्याही परिस्थितीत भूमिकेशी तडजोड करणार नाही अशी भूमिका घेणार्या संग्राम जगताप हे सध्यातरी जिल्ह्यातील प्रखर हिंदुत्वावादी नेता म्हणून पुढे आले आहेत. त्यांची ही टोकाची भूमिका अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीसाठी अडचणीची ठरली असली तरी संग्राम जगताप आता ही भूमिका सोडतील अशी सुतराम शक्यता नाही. परिणामांची चिंता कधी केली नाही आणि करणारही नाही, ही त्यांची भूमिका आता उघड झाली असल्याचेच स्पष्ट आहे.
संग्राम जगताप सलग तीनदा आमदार झाले असले तरी त्याआधी त्यांनी नगरसेवक- महापौर या पदाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. नगरसेवक होण्याआधी प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम त्यांनी केले. स्व. अरुणकाका जगताप यांनी कार्यकर्त्यांचा मोठा संच कायम सोबत ठेवला. स्व. अरुणकाका आणि काही प्रमाणात संग्राम जगताप यांनी मुुस्लिम समाजाला गोंजरण्याचे काम केले आणि याच समाजाच्या पाठबळावर आज संग्राम जगताप आमदार आहेत अशी चर्चा होऊ लागली आहे. अरुणकाकांच्याबाबत काही प्रमाणात या चर्चेत तथ्य असल्याचे मानले तरी संग्राम जगताप हे त्याला अपवाद ठरले आहेत.
संग्राम जगताप हे पहिल्यांदा नगरसेवक झाले. ज्या प्रभागातून ते विजयी झाले, त्या प्रभागात मुस्लिम मतदारांची संख्या दोन आकड्यात देखील नव्हती. पुढे ते महापौर झाले. त्यांच्या महापौर होण्यात मुस्लिम नगरसेवक असले तरी पक्षाची भूमिका आणि व्हीप यातून त्यांनी संग्राम जगताप यांना मतदान केले. यानंतर संग्राम जगताप पहिल्यांदा म्हणजेच २०१४ मध्ये अनिल राठोड यांना पराभूत करत पहिल्यांदा आमदार झाले. त्या निवडणुकीत संग्राम जगताप हे ३ हजार ३०० मतांनी विजयी झाले होते. तो त्यांचा विधानसभेतील पहिला विजय. मुुस्लिम मतांच्या जीवावर जगताप कुुटुंबाचे राजकारण उभे राहिल्याची जी काही चर्चा होत आहे ती सपशेल खोटी असल्याचे आकडे सांगत आहेत. अरुणकाका जगताप हे विधान परिषदेवर दोनदा निवडून गेले. त्या निवडणुकीचा आणि मुस्लिम अथवा अन्य समाजाच्या, धर्माच्या मतांचा संबंधच नाही. त्याआधी अरुणकाका नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्या निवडणुकीतही अरुणकाका ज्या- ज्या प्रभागांमधून निवडून आले तेथील मुुस्लिम मतदारांचे प्रमाण अत्यंत नगण्य होते.
सन २०१४ च्या निवडणुकीत पहिल्यांदा विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या आणि विजयीश्री खेचून आणणार्या संग्राम जगताप यांच्या विरोधात स्व. अनिल राठोड (शिवसेना), सत्यजित तांबे (काँग्रेस) अभय आगरकर (भाजपा) हे प्रमुख तीन उमेदवार होते. त्यावेळी अनिलभैय्या यांना ४७ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. त्याखालोखाल अभय आगरकर यांना ३९ हजार आणि सत्यजित तांबे यांना २७ हजार मते मिळाली होती. त्यावेळी प्रभागनिहाय झालेल्या मतमोजणीच्या आकडीवारीत डोकावल्यास मुस्लिम बहुल प्रभागांमधून सत्यजित तांबे यांना सर्वाधिक मते मिळाल्याची नोंद आहे. त्याखालोखाल अनिलभैय्या यांना आणि त्या भागात तिसर्या क्रमांकाची मते संग्राम जगताप यांना मिळाल्याची नोंद आहे. याचाच अर्थ संग्राम जगताप यांच्या विधानसभेतील पहिल्या विजयात हा मुस्लिम समाज त्यांच्यासोबत नव्हताच! २०१९ मध्ये झालेल्या दुरंगी लढतीत संग्राम जगताप हे जवळपास दहा हजारापेक्षा जास्त मते मिळवून विजयी झाले. त्यावेळी अनिलभैय्या आणि संग्राम या दोघांमध्ये सरळ लढत झाली. त्यावेळी जगताप यांना याच मुस्लिम बहुल भागातून थोडीफार मते मिळाली.
सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीला तिसर्यांदा सामोरे जाण्याआधी संग्राम जगताप यांनी महापालिकेत समर्थकांची सत्ता आणली. त्यावेळी मनात जातीभेद न ठेवता समदखान यांना गटनेता केले. हाजी नजीर यांना उपमहापौर केले. मुकुंदनगरमधील शेख सरांच्या कन्या नसीम खान यांना महिला व बालकल्याण समिती सभापती पद दिले. याशिवाय नगर शहरातील चार- पाच प्रमुख कब्रस्तानांसाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला अणि त्या माध्यमातून तेथील कामे मार्गी लावली. मुुकुंदनगरमधील गल्लीबोळात सिमेंट रस्ते दिले. हे सारे केल्यानंतर हा समाज विधानसभेसाठी सोबत राहिल अशी अपेक्षा संग्राम जगताप यांनी ठेवणे यात गैर काहीच नाही. मात्र, प्रत्यक्षात घडले उलटेच! अनके बुथवर संग्राम जगताप यांना दोन आकडी देखील मतदान मिळाले नाही हे वास्तव सत्य आहे. ३९ हजारांपेक्षा जास्तीची मते मिळवून आमदार म्हणून तिसर्यांदा निवडून आल्यानंतर संग्राम जगताप यांनी निकालाच्या दुसर्या दिवसापासून हिंदु अजेंडा हाती घेतला हेही समजून घेण्याची गरज आहे.
गेल्या काही महिन्यात हा अजेंडा अतीशय प्रखरपणे समोर येत आहे आणि संग्राम जगताप देखील या विषयावर जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर जाऊन आपली भूमिका परखडपणे मांडू लागले आहेत. नगर शहरापुरते मर्यादीत हिंदुत्व न ठेवता गेल्या काही महिन्यात संग्राम जगताप हे थेट जिल्ह्याच्या कानाकोपर्यात हिंदुत्वाची भूमिका घेत हिंदुंवर होणार्या अन्यायाच्या विरोधात थेटपणे मुस्लिम समाजाला अंगावर घेऊ लागले. राष्ट्रवादीची सेक्युलर भूमिका असल्याचे अजित पवार हे सांगत असताना संग्राम जगताप यांनी त्याला छेद दिला. अजितदादांनी संग्राम जगताप यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली असताना संग्राम जगताप यांनी दादांना भेटून भूमिका मांडेल अशी प्रतिक्रिया दिलीय. दादांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहिल्याने संग्राम जगताप यांच्याबद्दल पुन्हा चर्चा झडल्या. मात्र, वारीतील वारकरी आणि त्यांची सेवा महत्वाची असल्याचे कारण त्यांनी दिलेय. लवकरच दादांना भेटेल, असेही ते सांगत आहेत.
अक्कलकोट येथील सभेत संग्राम जगताप यांनी टोकाचे भाषण केले आणि त्याचे पडसाद उमटले असले तरी त्याआधी त्यांनी कर्जत, शनिशिंगणापूरमध्ये केलेली भाषणे देखील कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारीच होती हेही लक्षात घेतले पाहिजे. त्याचवेळी त्यांनी माजी आमदार आसीफ शेख यांच्या भूमिकेबद्दल बोलताना आसिम शेख यांचीच डीएनए टेस्ट करावी लागेल असे टोकाचे विधान केले. या संपूर्ण प्रकरणात अजित पवार यांची आणि राष्ट्रवादीची अडचण झाली असली तरी संग्राम जगताप यांची एकूणच भूमिका पाहता आता ते प्रखर हिंदुत्वाच्या मुद्यापासून फारकत घेतील असे वाटत नाही.