मुंबई । नगर सहयाद्री:-
आपण इतर वाहनांच्या टायरमध्ये हवा भरतो, पण ट्रॅक्टरच्या टायरमध्ये हवेऐवजी पाणी भरलं जातं. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, आणि काहींना त्यामागचं कारण कळत नसेल. चला तर मग, याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
शेतीची बहुतेक कामं आता ट्रॅक्टरच्या मदतीने केली जातात, आणि त्यामुळे शेतकऱ्याला विविध वातावरणात आणि पृष्ठभागावर ट्रॅक्टर चालवावा लागतो. परंतु, ट्रॅक्टरच्या काही मर्यादा असतात. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा अशा विविध ऋतूंमध्ये शेतकरी ट्रॅक्टर चालवतो, आणि काही वेळा ट्रॅक्टर अडकतो किंवा भार वाहून नेण्यात असमर्थ होतो. अशा वेळी ही समस्या सोडवण्यासाठी, ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी भरलं जातं.
या प्रक्रियेला इंग्रजीत टायर्सचे बॅलेस्टिंग (Ballasting) म्हणतात. जेव्हा ट्रॅक्टर शेतामध्ये किंवा रस्त्यांवर जातो, तेव्हा त्याच्या चाकांना पुरेसं घर्षण मिळतं. पण जेव्हा तो ट्रॅक्टर अशा ठिकाणी जातो जिथे घर्षण कमी असतं, तेव्हा चाके घसरू लागतात. अशा परिस्थितीत, ट्रॅक्टर योग्य प्रकारे भार घेऊ शकत नाही. म्हणूनच, टायरचे बॅलेस्टिंग करणे आवश्यक ठरते.
ज्या शेतांमध्ये पुरेसं पाणी असतं, किंवा शेत निसरडे असतं, तिथे ट्रॅक्टर चालवायला अधिक कठीण जातं. विशेषतः भातशेतीतील शेतात, जिथे पाणी खूप असतं, तिथे ट्रॅक्टर चालवणे अवघड होते. अशा वेळी, टायरचे बॅलेस्टिंग करून घर्षण वाढवले जाते, ज्यामुळे ट्रॅक्टर अधिक सहजतेने भार वाहून नेऊ शकतो