जामखेड । नगर सहयाद्री:-
रोहीत आमच्या बरोबर होता त्यावेळी या कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी मोठा निधी दिला आता रोहीत आमच्या बरोबर नाही. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न, एसटी बसस्थानक, पिण्याचे पाणी, शेतीला पाणी आदी प्रश्न जामखेड तालुक्यात निर्माण झाले आहेत. औद्योगिक वसाहत म्हणून दिंडोरा पिटला गेला पण ती झाली नाही. या सर्व प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका पुढील काळात राहणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालय उद्घाटन व पक्षप्रवेश कार्यक्रम गुरुवार रात्री झाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रीय युवक अध्यक्ष धिरज शर्मा, राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, सचिन गायवळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, राजेंद्र गुंड, ॲड. बाळासाहेब मोरे, प्रदेश युवती अध्यक्ष संध्या सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, बेलवंडी सरपंच ऋषीकेश शेलार व श्रीगोंदा येथील असंख्य कार्यकर्ते जामखेड येथील माजी नगरसेवक राजेश वाव्हळ, शामीर सय्यद, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गणेश काळे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले, पुढील पन्नास वर्षाचा कालावधी बघून कामे करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी घेतला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. शासनाचा पैसा वाया जाणार यासाठी लक्ष ठेवून आहोत. लोकशाही टिकण्याचे काम छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मदतीने झाले आहे. देशात प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख झाली आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पाण्याचे अपुरे पडू लागले आहेत यासाठी शासनाने प्रथम पिण्याचे पाणी, यानंतर शेतीला व नंतर औद्योगिक कारणासाठी देण्याचे ठरवले असून गावाचे वाहून जाणारे सांडपाणी हे रिसायकल करून औद्योगिक क्षेत्रासाठी वापर केला जाईल. यापूर्वी वीज कोळसा व पाण्यापासून होत होती आता ती सात प्रकारे तयार केली जात आहे.