अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची पुणे येथे साखर आयुक्तपदी बदली झाली आहे.. याबाबतचे आदेश मंगळवारी सायंकाळी निघाले असून सालीमठ यांच्याकडे राज्याच्या साखर आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी कोण? हा सस्पेन्स कायम आहे.
मंगळवारी सायंकाळी राज्य सरकारकडून आयएएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात 9 अधिकार्यांसह जिल्हाधिकारी सालीमठ यांचे नाव आहे. गेल्या दोन वर्षापासून सालीमठ नगरचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते. त्या काळात अनेक नवीन उपक्रम त्यांनी राबविले. सिद्धाराम सालीमठ मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असले तरी राहुरी कृषी विद्यापीठातील उच्च शिक्षणाच्या निमित्ताने नगरशी जोडले होते.
त्यांच्या कार्यकाळात विविध योजनांमध्ये जिल्हा राज्यात पहिल्या स्थानावर होता. गौणखनिज, ई-रेकॉड्स, ई-क्युजेकोर्ट प्रणाली, जलदूतद्वारे टंचाई व्यवस्थापन, भुसंपादन आदीसाठी माहिती तंत्रानाचा प्रभावीपणे वापर करण्यावर सालीमठ यांनी भर दिला. शासकीय यंत्रणेला जनतेच्या दारात नेण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात यशस्वी झाला. मुख्यमंत्री शाश्वत शेतीसिंचन योजनेअंतर्गत राज्यात सर्वाधिक वैयक्तिक शेततळे पूर्ण करण्याचा मान अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाला आहे.