Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सूनने १२ दिवस आधीच हजेरी लावली असून, गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. आज मंगळवारी (२७ मे २०२५) देखील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, पुणे आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव जाणवतो आहे.
मुंबई शहरात आज पहाटेपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हिंदमाता, दादर, अंधेरी, वांद्रे या भागांत रात्रीपासून सतत हलकासा पाऊस सुरु आहे. सोमवारी पावसामुळे मुंबईतील मेट्रो स्थानकांमध्ये पाणी शिरले होते आणि रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. हवामान विभागाने आजही मुंबईसाठी येलो अलर्ट दिला आहे, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
हवामान खात्याने राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा रायगड, पुणे (घाटमाथा), सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली आणि उर्वरित राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.