Weather Update: शेतकऱ्यांना सतत बदलणाऱ्या हवामानाचा फटका बसत असून, पाऊस कधी पडेल, किती पडेल, वारे, तापमान, आर्द्रता कशी असेल याचा अचूक अंदाज न मिळाल्यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे. मात्र आता यावर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ‘फार्मर आयडी’च्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना स्थानिक हवामानाचा अचूक अंदाज थेट त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या निर्णयासाठी उपयुक्त ठरणारी माहिती वेळेवर मिळणार आहे.
6.5 कोटी शेतकऱ्यांचा ‘फार्मर आयडी’ तयार
सध्या देशभरात 6.5 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले असून, यात शेतकऱ्याचे नाव, आधार क्रमांक, शेतीचे क्षेत्र, पिकांची माहिती व जमिनीच्या नोंदींचा समावेश आहे. शेतकऱ्याच्या शिवाराचे लोकेशन GPS आधारित पद्धतीने सरकारकडे उपलब्ध आहे.
हवामान अपडेट थेट मोबाइलवर
या माहितीचा वापर करून भारतीय हवामान खात्याच्या मदतीने शेतकऱ्यांना त्याच्या भागातील अचूक हवामानाचा अंदाज SMS किंवा अॅपद्वारे कळवण्यात येणार आहे. यामध्ये पुढील आठवड्यातील पावसाचे प्रमाण, तापमान, आर्द्रता, वाऱ्याची दिशा व गती यांचा समावेश असेल. ही माहिती शेतकऱ्याच्या मातृभाषेत व रिअल टाइममध्ये पाठवण्यात येईल.
शेतीचे नियोजन सोपे होणार
या हवामान अपडेटमुळे शेतकरी खते, पेरणी, फवारणी, कापणी, सिंचन यांसारख्या कामांचे योग्य नियोजन करू शकतील. यामुळे पीक उत्पादनात वाढ होईल व आर्थिक नुकसान टाळता येईल.
फार्मर आयडीचे भविष्यातील उपयोग
या ‘फार्मर आयडी’चा उपयोग भविष्यात सरकारी योजना लाभ, अनुदान, विमा, बाजारभाव, प्रशिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये होणार आहे. यामुळे योजनांचा लाभ पारदर्शकपणे व थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असा सरकारचा दावा आहे.