पारनेर । नगर सहयाद्री
नगर-पुणे महामार्गावरील चेतक इंटरप्रायजेस कंपनीच्या सुपा टोलनाक्यावरील नियमबाह्य टोलवसुली विरोधात पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी विधानभवनात आवाज उठवला. औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी टोलवसुलीतील गंभीर अनियमितता आणि आर्थिक अपहार उघडकीस आणत शासनाचे लक्ष वेधले.
१३२ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी कंपनीने आतापर्यंत तब्बल ७०० कोटी रुपये वसूल केले असून, ही थेट जनतेची आर्थिक लूट आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असून केवळ पॅचवर्क डांबरीकरण केले गेले आहे. शासकीय नियमानुसार ४ ते ५ वर्षांत ४० मिमी जाडीचे नवीन डांबरीकरण करणे बंधनकारक आहे, तसेच वृक्षलागवडही अपेक्षित आहे. परंतु कंपनीने कोणतीच जबाबदारी पार पाडलेली नाही, असा आरोप आमदार दाते यांनी केला.
त्यांनी टोलवसुली अटींचा भंग करत ॲम्ब्युलन्स, क्रेन व आपत्कालीन सेवा न पुरवण्याच्या निष्काळजीपणावरही प्रकाश टाकला. त्यामुळे अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळत नसल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आल्याचे त्यांनी ठणकावले. आ. दाते यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेवरही बोट ठेवत, कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. या आर्थिक अपहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. हा मुद्दा जनतेच्या हिताचा असून, शासनाने तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.
चेतकच्या लुटीला आ. दाते यांचा आक्रमक इशारा!
चेतक इंटरप्रायजेसच्या मनमानी टोलवसुलीविरोधात आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत जोरदार हल्लाबोल केला. १३२ कोटींच्या प्रकल्पासाठी ७०० कोटींची लूट, निकृष्ट रस्ते आणि अपघातांचा वाढता धोका यावर त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. ही जनतेची थेट आर्थिक पिळवणूक आहे. कंपनी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे!” अशी आक्रमक मागणी त्यांनी लावून धरली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी, असा त्यांचा आग्रह आहे.
नागरिकांचा जीव धोक्यात, चेतकची बेपर्वाई उघड!
सुपा टोलनाक्यावर चेतक इंटरप्रायजेसने शासकीय नियम धाब्यावर बसवले असल्याचा गंभीर आरोप आमदार काशिनाथ दाते यांनी केला. खड्ड्यांनी व्यापलेल्या रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले, तरी कंपनीकडून ॲम्ब्युलन्स किंवा आपत्कालीन सुविधा नाहीत. नागरिकांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या कंपनीला तातडीने जाब विचारला पाहिजे! असे दाते यांनी ठणकावले. शासकीय अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेवरही त्यांनी बोट ठेवत, या लुटीला आळा घालण्यासाठी चौकशीची मागणी केली.