युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पायी दिंडीत सेवा । डॉ जयश्रीताई थोरात यांचा सक्रिय सहभाग
संगमनेर । नगर सहयाद्री:-
वारकरी संप्रदायाच्या विचारांप्रती निष्ठा राखत डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील ५०० युवक व युवतींनी यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात सक्रिय सहभाग घेत आरोग्य, स्वच्छता आणि अन्नसेवा आदी माध्यमातून वारकऱ्यांची सेवा केली.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही संगमनेरी, विठुरायाचे वारकरी” या ब्रीदवाक्याखाली युवक काँग्रेसच्या या विशेष दिंडीने संगमनेर-अहिल्यानगर मार्गे टेंभुर्णी येथे दाखल होत संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दर्शन घेतले.या प्रवासात वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, अन्नवाढ, स्वच्छता मोहीम, संवाद सत्रे आयोजित करण्यात आली.
सुमारे ७० किलोमीटरच्या या प्रवासात डॉ. जयश्रीताई थोरात यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत स्वयंपाक, प्रसाद वाटप, मुक्काम व्यवस्थापन या सर्व उपक्रमांमध्ये थेट सहभाग घेतला.विविध गावांमध्ये कीर्तन व प्रवचन सत्रात सहभाग, तसेच महिलांशी वैयक्तिक संवाद हा उपक्रमही पार पडला.
सोलापूर जिल्ह्यातील करकम येथीलरिंगणामध्ये ही सहभाग घेत वारकरी रिंगणाचा आनंद लुटला. या रिंगणामध्ये माऊली माऊलीच्या गजरात डॉ जयश्रीताई थोरात डोक्यावर तुळशी घेऊन सहभागी झाल्या. या रिंगणासाठी सुमारे दोन ते अडीच लाख वारकरी उपस्थित होते.
थोरात कुटूंबाची वारकरी संप्रदायाची विचारधारा!
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वारकरी संप्रदायाची विचारधारा कायम जपली आहे. मानवता हा खरा धर्म असलेल्या या संप्रदायात कोणताही जातिभेद किंवा उच्च-नीचतेचा भाव नाही. सर्वजण ‘माऊली’ म्हणून एकमेकांशी आदराने वागतात, पाया पडतात आणि हीच परंपरा महाराष्ट्राचे वैभव आहे.
– डॉ. जयश्रीताई थोरात
थोरात कुटुंबीयांची वारकरी परंपरेशी नाळ: खा लंके
थोरात परिवाराला समाजकार्याची व वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन समाज विकासाचे काम केले आहे .आणि हीच शिकवण वारकरी संप्रदायाने दिली आहे. गोरगरिबांची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा असून डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात तरुणांनी वारीमध्ये सहभाग घेऊन सेवा दिली हा कौतुकास्पद उपक्रम असल्याचे खा लंके म्हणाले.