फक्त चार दिवसांचे पाणी शिल्लक; जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे, आमदार काशीनाथ दाते यांना साकडे
निघोज | नगर सह्याद्री:-
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची यात्रा गेल्या शुक्रवार 11 एप्रिलपासून सुरू झाली असून ऐन मुख्य यात्रच्या वेळी पिण्याच्या पाणीटंचाईचे संकट येण्याची शक्यता असून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार काशीनाथ दाते यांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासन पातळीवर पाणी सोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करावी अशी मागणी भावीक व जनतेतून होत आहे.
कुकडी डावा कालव्याला गेली दोन महिने पाणी सोडण्यात आले होते. पंचवीस दिवसांपूव निघोज येथील पुष्पावती नदीपात्रात असलेला कपिलेश्वर बंधारा भरून घेण्यात आला . मात्र बंधाऱ्याला असलेले लोखंडी दरवाजे खराब असल्याने नजीक असलेल्या शेतीमुळे बंधारा कोरडा पडला. आजमितीला फक्त चार दिवस पुरेल एवढेच पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. या बंधाऱ्यावर निघोजची नळपाणी पुरवठा योजना अवलंबून असल्याने यात्रेच्या दरम्यान म्हणजे साधारण 17 एप्रिलपर्यंत या बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्याची गरज निर्माण झाली आहे.
देवीच्या यात्रेसाठी 21 ते 28 एप्रिलपर्यंत लाखो भाविक याठिकाणी निवासी असतात. संपूर्ण यात्राकाळात येणाऱ्या भाविकांची संख्या पाच ते सहा लाखांच्या आसपास असते. मुख्य यात्रेच्या चार दिवसांत फक्त पिण्यासाठी कोट्यवधी लिटर पाण्याची आवश्यकता असल्याने 17 रोजी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. ग्रामपंचायतचे सर्वेसर्वा सचिन पाटील वराळ हे राज्याचे जलसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत ते पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
तसेच आमदार काशीनाथ दाते यांच्याकडे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. बाळासाहेब लामखडे, युवा नेते रमेशशेठ वरखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास लामखडे, विश्वस्त व शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद आदी प्रयत्नशील आहेत.