नियमित पाणीपुरवठा करा | माजी नगरसेवक संग्राम शेळके यांचे आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
अहिल्यानगर शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या मुळा धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतांनाही केडगाव परिसरातील नागरिकांना चार – पाच दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने घेऊन केडगाव परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी यासाठी केडगाव परिसरात तात्काळ दररोज किंवा किमान दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक पै. संग्राम शेळके यांनी महापालिका आयुक्त डॉ. यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेळके यांनी निवेदनात म्हटले आहे की, केडगाव हे झपाट्याने वाढणारं उपनगर आहे. केडगावमध्ये सक्षम पाणी योजना असतानाही नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतांनाही केडगावकरांना पुरेसा पाणी पुरवठा केला जात नाही. केडगावला तुटपुंजा व वेळेअवेळी पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी पहाटे पावणे चारला पाणी पुरवठा केला जातो. सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने महिलांसाठी ही वेळ अयोग्य आहे. नागरिक पाणीपट्टी भरतात मग त्यांना दररोज पाणी का मिळू नये? ही बाब अन्यायकारक व गंभीर आहे.
केडगाव परिसरातील नागरिकांना दररोज किंवा किमान दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करावा, गळती व तांत्रिक अडथळ्यांवर तातडीने उपाय कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तांनी तात्काळ निर्णय घेऊन केडगावकरांना पाण्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवू नये, असा इशारा माजी नगरसेवक शेळके यांनी दिला आहे.
पाणी प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार
केडगाव परिसरातील नागरिकांच्या पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र पाणी योजना असतांनाही केडगावासियांना चार-पाच दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय. ही बाब अन्यायकारक आहे. महापालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन नियमित पाणी पुरवठा न केल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक संग्राम शेळके यांनी दिली.
केडगावसाठी स्वतंत्र पाणी योजना;
दररोज पाणी पुरवठा करण्यात यावा
माजी महापौर संदीप कोतकर यांनी महापौरपदाच्या काळात केडगावसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करुन ती पूर्ण केली. त्या योजनेच्या माध्यमातून केडगावकरांना दररोज पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा होती. केडगावसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना असतांनाही महापालिकेकडून आजही केडगावकरांना चार- पाच दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. हा केडगावकरांवर अन्याय आहे. याची महापालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन केडगाव परिसरातील नारिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी अशी मागणी माजी नगरसेवक संग्राम शेळके यांनी केली आहे.