Weather Update: एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात प्रचंड उष्णतेचा कहर जाणवत आहे. काही भागांमध्ये तापमान 42 अंशांच्या वर गेलं आहे. अशातच येत्या 13 आणि 14 एप्रिल रोजी राज्यात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येणार असून त्याचा फटका विदर्भ आणि मराठवाडा विभागांना बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुण्यातील काही भागांत पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या पावसामुळे कमाल तापमानात 3-5 अंशांची घट होणार असून दिवसा ढगाळ हवामानामुळे उकाडा काहीसा वाढण्याची शक्यता आहे.
नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने गारपिटीचा विशेष अलर्ट जारी केला आहे. या भागांत वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट होऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13-14 एप्रिल रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव परिसरात देखील पावसाचे ढग निर्माण होण्याची शक्यता असून हवामानात घसरण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यभरात उष्णतेचा तडाखा जाणवत असतानाच हवामानात होणारा अचानक बदल आणि गारपिटीचा धोका ही शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बाब आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.