घोड प्रकल्पाच्या फेर जल नियोजनास शासनाची मंजुरी
सुनील चोभे / नगर सह्याद्री
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुयातील मौजे चिंचणी येथील घोड धरणाच्या फेर जल नियोजनास राज्याच्या जलसंपदा विभागाने शुक्रवारी (दि.२१ मार्च) मंजुरी दिली असून या फेर जल नियोजनात प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे साकळाई योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. दरम्यान साकळाई योजनेचा मार्ग मोकळा झाला असल्याने लाभधारक शेतकर्यांमध्ये आनंदोत्सव आहे.
विखे पाटलांनी शब्द पाळला
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अहमदनगर लोकसभा मतदासंघातील भाजपाचे तत्कालिन उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ वाळकी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकळाई योजनेचा शब्द दिला होता. परंतु, त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले व साकळाई योजनेचा प्रश्न मागे पडला. त्यानंतर पुन्हा युतीेचे सरकार आल्यानंतर युती सरकारच्या काळात माजी खासदार सुजय विखे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साकळाई योजनेसाठी आवश्यक असणारे पाणी उपलब्ध असल्याचे दाखवून दिले. व साकळाई योजनेसाठी मंत्रालय स्तरावर बैठका घेतल्या. आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत. सरकारमध्ये जलसंपदा मंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर पडताच मंत्री विखे पाटील यांनी साकळाई योजना मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले होते. आज साकळाई योजनेचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकर्यांमधून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आभार मानले जात आहे.
कृती समितीने उभारला लढा
गेल्या ३०-४० वर्षांपासून साकळाई योजनेचा प्रस्ताव धूळ खात पडला होता. दरम्यान साकळाई योजना मार्गी लागावी यासाठी साकळाई कृती समितीच्यावतीने लढा उभारण्यात आला. वेळोवेळी आंदोलने, रास्तारोको करण्यात आले. शासन दरबारी पाठपुरावा केला.दरम्यान विधानसभेच्या निवडणुका होऊन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. तसेच जलसंपदा खाते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकड सोपविण्यात आले. कृती समितीच्यावतीने वारंवार साकळाई योजनेचा जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. नुकतीच कृती समितीच्यावतीने मंत्री विखे पाटलांची भेट घेतली होती. त्यावेळीही लवकरच साकळाई योजनेचा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले होते.
काय म्हटलेय आदेशात
या शासन निर्णयात म्हंटले आहे की, घोड मोठा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत ऊर्ध्व भीमा या प्रदेशात आहे. या योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुयातील मौजे चिंचणी येथे घोड नदीवर शिरूर तालुयातील मौजे चिंचणी व अहिल्यानगर जिल्ह्यातील मौजे वडगाव शिंदोडी या गावांच्या सरहद्दीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. प्रकल्पाचे काम सन १९६५ मध्ये पुर्ण होवून प्रकल्पावर सिंचन सुरू आहे.
घोड प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालानुसार प्रकल्पाची एकुण साठवण क्षमता २१६.३० द.ल.घ.मी (७.६३ अ.घ.फु.) असून प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा १५४.८० द.ल.घ.मी. (५.४६ अ.घ.फु.) एवढा आहे. मंजूर प्रकल्प अहवालानुसार प्रकल्पाचा सिंचनाचा पाणीवापर १० अ.घ.फु. एवढा आहे. कृष्णा पाणी तंटा लवादाचे अनुषंगाने केंद्रीय जल आयोगास सादर केलेल्यानुसार घोड प्रकल्पासाठीची वार्षिक पाणी वापराची तरतूद ही १०.४० अ. घ. फू. इतकी आहे.
महामंडळाने सादर केल्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व नगर तालुयातील ३२ गावातील ल.पा तलाव, को.प. बंधारे, साठवण बंधारे भरून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची मागणी आहे. त्यामुळे वरील मागणीनुसार सदर क्षेत्रासाठी घोड प्रकल्पांतर्गत धरणाच्या उत्तर-पूर्व दिशेला असणार्या अवर्षण ग्रस्त प्रदेशातील सिंचनासाठी व पिण्यासाठी साकळाई उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे.
घोड प्रकल्पाचा सन २००९-२०२१ या कालावधीतील घोड प्रकल्पाचा वार्षिक महत्तम पाणीवापर ७.९८ अ.घ.फु. इतका असुन नियोजित वार्षिक पाणीवापरापेक्षा (१०.४०-७.९८) २.४२ अ.घ.फु. ने कमी आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत १२००० हेटर क्षेत्रास सिंचनासाठी १.६ अ.घ.फु. पाणी व पिण्यासाठी ०.२ अ.घ.फु. पाणी अशाप्रकारे एकूण १.८ अ.घ.फु. पाणी घोड धरणातून प्रस्तावित करण्यात आले आहे. अशाप्रकारे घोड प्रकल्पाचा आज अखेर महत्तम वार्षिक पाणीवापर व प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक पाण्याची गरज लक्षात घेता सदर पाणी घोड प्रकल्पाचे अस्तिवातील वार्षिक पाणीवापराच्या तरतुदीतून भागवणे शय असल्याचे महामंडळाने सादर केले आहे.
तथापि प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची तरतूद घोड प्रकल्पाचे अस्तिवातील पाणी नियोजनात नसलेने घोड प्रकल्पाचे फेर जलनियोजन मंजूर करणे विचाराधीन होते. घोड मोठा प्रकल्प, ता. शिरूर, जि. पुणे प्रकल्पाचे पाणी वापराचे फेरनियोजनाबाबत खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
उपरोक्त नमूद बदलानुसार कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांनी सादर केलेल्या पाणी वापराच्या फेर जलनियोजनास खालील शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.
१) घोड प्रकल्पाचे मुळ लाभधारक सिंचनापासून वंचित राहणार नाही, याची संपुर्ण जवाबदारी महामंडळाची राहील.
२) प्रकल्पाचा पाणीवापर कृष्णा पाणी तंटा लवादाने अनुज्ञेय केल्याप्रमाणे कृष्णा खोर्याचे जलनियोजनाच्या मर्यादेत राहील, याची दक्षता घेण्यात यावी.
३) शासन निर्णय दि.२३/११/२०१६ अन्वये साकळाई उपसा सिंचन योजनेस सक्षम स्तरावर मान्यता झाल्याशिवाय कोणतेही निविदेबाबत कार्यवाही करण्यात येवू नये. असे या शासन निर्णयात म्हंटले आहे.