सांगोला / नगर सह्याद्री –
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुतारी फुंकून कुठे पाणी येत नसतं, त्यासाठी रात्रंदिवस काम करावे लागते, असे म्हणत थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे. सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामाचे भूमिपूजन विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
विखे-पाटील पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसासिंचन योजनेचे काम सुरू होणार असल्याने १२ गावांतील सुमारे १५ हजार ४०० हेक्टर जमिनींना लवकरच कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपून तीन वर्षात तालुका शंभर टक्के दुष्काळमुक्त होणार आहे,” असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.
पुढे शरद पवारांचे नाव न घेता विखे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र ज्यांना जाणता राजा म्हणत होता, त्यांनी कायम दुष्काळी भागाला पाणी देणे खर्चात बसत नसल्याची उत्तरे दिली होती. आता फडणवीस ज्या पद्धतीने दुष्काळ मुक्तीसाठी काम करत आहेत, ते पाहता नुसत्या तुताऱ्या फुकून काही होत नसतं,” असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना लगावला.
संजय राऊत हे मनोरुग्ण; विखे पाटलांची टीका
यावेळी विखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांनी संतोष देशमुख हत्येमागे भाजप आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. यावर बोलताना विखे पाटील यांनी टीका केली. विरोधकांना महायुतीने मिळविलेला विराट विजय पचनी पडला नाही. त्यामुळं कोण काय बोलते याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला. तसेच संजय राऊत हे मनोरुग्ण आहेत. त्यांची जागा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. आता त्यांच्या नेत्यांनीच ते पहावे अन्यथा जनता त्यांना जागा दाखवेल अशी टीका विखे पाटलांनी राऊतांवर केली.
सांगोल्यात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, दीपक साळुंखे उपस्थित होते.