अहिल्यानगर । नगर सहयाद्री
नगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पारनेर, संगमनेर, कर्जत, अकोले, पाथर्डी तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा चिंतेत आला असून त्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. एका रात्रीत शेतात उभं असलेले पीक आडवं झाले आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आंबा, द्राक्ष, सफरचंद, पपई या सर्व फळबागांचे नुकसान झाले आहे. त्याचसोबत लिंबू, कांदा, मका या पिकांचे देखील मोठं नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांची देखील पडझड झाली आहे.
वर्धा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे पपईची बागा उद्ध्वस्त झाल्या. नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला. गंगापूर गावातील 6 घरांचे प्रचंड नुकसान झाले. बुलडण्यात सकाळपासून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी लावली. शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे पुन्हा नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. सध्या बाजारात द्राक्षाला 65 ते 70 रुपये भाव मिळत होता. मात्र अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्षाची गुणवत्ता ढासळल्याने भावावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
कांदा, संत्रा, लिंबू पिकांचे नुकसान
अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. कांदा, संत्रा, लिंबू, आंब्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. पश्चिम विदर्भात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संगमनेर, अकोलेत गारपीट
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. बुधवारी सायंकाळी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर- खंदरमाळ परीसर आणि अकोले तालुक्यात अनेक गावात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातोंडाशी आलेला कांदा, गहू भुईसपाट झाला तर वाटाणा, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच शेतमालाला दर नसल्याने सुल्तानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढवले आहे.
टाकळी, तिखोल, कान्हूर पठारला पाऊस
पारनेरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी टाकळी ढोकेश्वर, ढोकी, धोत्रे, वडगाव सावताळ, तिखोलसह अनेक गावांना अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे कांदा, गहू, टोमॅटो, वाटाणा या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या: डॉ. थोरात
बुधवारी 2 एप्रिल संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कौठे धांदरफळ येथील निवृत्ती रखमा घुले यांच्या दोन गाई वीज पडून मृत पावल्या. या घटनेमुळे घुले कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी आज तातडीने घुले कुटुंबीयांची भेट घेऊन याबद्दल दुःख व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले, प्राजक्ता घुले आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. जयश्री थोरात यांनी दु:ख व्यक्त करत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.डॉ. थोरात म्हणाल्या, शेतकरी खूप कष्टाने पिके घेतात. संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. दुधाचा तालुका म्हणून आपली ओळख आहे. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. घुले कुटुंबाच्या गाई मृत पावल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने मदत द्यावी. पांडुरंग घुले म्हणाले, बाळासाहेब थोरात महसूल आणि कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना खूप मदत मिळत होती. त्यांनी कधीही राजकारण न करता सर्वांना सोबत घेतले. कालच्या अवकाळी पावसानंतर त्यांनी तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली. यावेळी डॉ. जयश्री थोरात यांनी घुले कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून अवकाळी पावसामुळे गायी दगावल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि परिसरातील नुकसानीची पाहणी केली.