spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार! शेतकरी आर्थिक संकटात

अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार! शेतकरी आर्थिक संकटात

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मागील आठ दिवसांपासून शहरासह जिल्हाभरात ढगाळ वातावरण पसरले होते. रविवारी सायंकाळी ढगफुटीसदृश अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावली. कोसळलेल्या दमदार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. तसेच शेतीचे देखील मोठे नुकसान झाले असून नागरिकांनी तातडीच्या पंचनाम्याची मागणी केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने शहरासह ग्रामीण भागात हाहाकार माजवला.नगर शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले, घरांमध्ये पाणी शिरले होते. आशा टॉकीज चौक, चितळे रोड, वाडिया पार्क आणि कोठी परिसरात रस्त्यांवर पाणी तुंबले, तर काही घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. सध्या शहरात रस्ते आणि ड्रेनेज लाईनची कामे सुरू असल्याने पावसामुळे रस्त्यांवर चिखल झाला, ज्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय झाली होती.

नगर तालुक्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कृषी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मोठा फटका बसला आहे. ३५ गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले असून, शेतीच्या कामांमध्ये असलेल्या अडचणी वाढल्या आहेत. आंबा, डाळिंब, मोसंबी, संत्रा, चिकू, लिंब आणि केळी यासारख्या फळांच्या बागांवर मोठा परिणाम झाला आहे.

याशिवाय पारनेर तालुक्यात आठ दिवसात कोसळल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. तिखोल, काकडेवाडी, हिवरे कोरडा, म्हसणे फाटा, ढवळपुरी, वडनेर, राळेगणसिद्धी, पानोली, वनकुटे, वासुंदे, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, सावरगाव, मांडओहळ या भागांतील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः मोठा फटका बसला. याशिवाय कांदा, वाटाणा, फ्लॉवर, कोबी, मिरची यांसारख्या भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. मका, कांदा, टोमॅटो, उन्हाळी बाजरी आणि मिरची पिकांचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यात 10 दिवस जोरदार पाऊस
हवामान विभागाने राज्याच्या विविध भागात मे महिन्याच्या शेवटच्या10 दिवसांत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. बुधवार 21 मे ते शनिवार 31 मे पर्यंतच्या दहा दिवसांत मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील 10 व मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात सोमवार 19 मे पासून पुढील आठवडाभर म्हणजे रविवार 25 मेपर्यत जोरदार तर विदर्भातील 11 जिल्ह्यात यादरम्यान मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सुपा मंडळात ५३.८ मिमी पावसाची नोंद
पारनेर- तालुक्यातील सुपा मंडळात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तीनच दिवसांत 53.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जी तालुक्यातील दहा मंडळांपैकी सर्वाधिक आहे. सुपा मंडळासह पारनेर तालुक्यातील एकूण दहा मंडळांमध्ये गेल्या आठवड्यात सरासरी 148 टक्के पाऊस नोंदवला गेला. या पावसाने काही ठिकाणी नाले आणि बांध तुडुंब भरले, तर काही गावांमध्ये ओढे प्रवाहित झाले. पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेती मशागतीला सुरुवात केली आहे. मात्र, हा पाऊस खरीप पिकांच्या पेरणीसाठी पुरेसा नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

अहिल्यानगरमध्ये पुढील तीन दिवस पाऊस
अहिल्यानगरच्या काही भागात 19 आणि 21 मे रोजी अर्थात पुढील दोन दिवस वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनकडून करण्यात आलं आहे. मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युतउपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या किंवा लोंबकळणाऱ्या केबल्स पासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज्) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये. मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. वादळी वारा, पाऊस व गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. दरम्यान, वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241- 2323844 अथवा 2356940 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेरचे नाव देशात उंचावणाऱ्यांचा अभिमान: आ. तांबे

संगमनेर | नगर सह्याद्री नुकत्याच पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये संगमनेरच्या खेळाडूंनी...

आगामी निवडणुकीचा निर्णय स्थानिक पातळीवर; उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले? वाचा

पुणे । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येईल, मुंबईबाबतचा...

जीएस महानगर बँक निवडणुकीसाठी चिन्ह वाटप जाहीर; कुणाला मिळाली ‘रिक्षा’तर कुणाला मिळाली ‘कपबशी’, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री जीएस महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या 1 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांना...

माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माजी महापौर आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर...