spot_img
अहमदनगरनिष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

spot_img

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट प्रेम भेटत असताना एका बापाला यापेक्षा वेगळ्या समाधानाची गरज नाही‌’!
सारिपाट / शिवाजी शिर्के
हातात कोणतीही मोठी सहकारी संस्था- शिक्षण संस्था नसताना, साखर कारखाना नसताना जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना सोबत घ्यायचं आणि त्यांना जपायचं! त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हायचं आणि त्यातून थोडीथीडकी नव्हे तर जवळपास चाळीस-पंचेचाळीस वर्षे कार्यकर्त्यांची फौज सांभाळायची! कोणतीही सत्ता हातात नसताना जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर मिळणं आणि ते जपून ठेवणे ही सोप्पी गोष्ट नाही. ते काम अरुणकाकांनी अत्यंत लिलया पार पाडले. काकांचं जाण्याचं वय नक्कीच नव्हतं! मात्र, वास्तवाला सामोरे जाण्याची हिम्मत सचिनभाऊ आणि संग्रामभैय्या या दोघांनीही दाखवली. बाप, म्हणून काकांना या दोघांच्याही बद्दल अत्यंत अभिमान होता. अजातशत्रू राहिलेल्या काकांना काळ असा गाठेन आणि काका आपल्यातून जातील असे कोणालाच वाटले नाही. म्हणून तर त्यांच्या जाण्याचा धक्का नगरकरांना बसलाय आणि त्यातून दहा दिवस झाले तरी कोणीच सावरायला तयार नाही. दहा दिवसांचा दुखवटाच नगरकरांनी पाळला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नगर शहरातील प्रत्येक छोट्या- मोठ्या रस्त्यावर काकांना श्रद्धांजली अर्पण करणारे फलक बरेच काही सांगून जातात. सचिनभाऊ आणि संग्रामभैय्यांसह संपूर्ण जगताप परिवाराला झालेले दु:ख शब्दातीत नक्कीच नाही. मात्र, या कुटुंबाला आणि खास करुन आमदार संग्रामभैय्या यांना यातून बाहेर पडावे लागेल आणि जनतेच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे लागणार आहे. काकांना अभिप्रेत असणारी समाजसेवा आणि गोरगरीबांचे अश्रू पुसण्याचे काम जोमाने हाती घेणे हीच काकांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. आमदार संग्रामभैय्या यात तसूभरही कमी पडणार नाहीत हेही तितकेच खरे!

बनपिंप्री (श्रीगोंदा) येथून नगरमध्ये आलेल्या बलभीमरावांचे काका हे सुपुत्र! हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून जम बसवाताना काका समाजकारणात, राजकारणात कधी सक्रिय झाले हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. नगराध्यक्ष आणि दोनदा आमदारकी मिळूनही काकांचे पाय कायम जमिनीवरच राहिले. नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही काळ राजकीय विजनवास घेतला. मात्र, समाजकारणात ते कायम सक्रिय राहिले. मित्र जमवणे, जपणे आणि त्यांच्या मदतीला धावणारे काका अनेकांनी अनुभवले. थोरले चिरंजीव सचिन यांनी गावाकडची नाळ कायम जपली आणि त्यातूनच त्यांना जिल्हा परिषदेत सलग तीनदा संधी मिळाली. धाकटे चिरंजीव संग्रामभैय्या यांनी शहरातील सवंगडी जपले आणि त्यांना सोबत घेत महापौर ते सलग तीनवेळा आमदार असा राजकीय प्रवास केला. मात्र, मध्यंतरीच्या काळात विधान परिषदेसारख्या अत्यंत वरच्या सभागृहात सलग दोनवेळा आमदार म्हणून काम करण्याची संधी अरुणकाका यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले.

स्वत: नगराध्यक्ष राहिलेल्या अरुणकाका यांना दोनवेळा आमदारकी, चिरंजीव संग्राम यांना सलग तीनदा आमदारकी आणि सचिन यांना सलग तीनदा जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. हे सारं राजकीय वैभव उभे राहिले असतानाही अरुणकाका यांनी कधीही सामान्यांशी असणारी नाळ तुटू दिली नाही आणि तीच परंपरा सचिनभाऊ आणि संग्रामभैय्या या दोघांनीही कायम ठेवलीय! अनेक पुढारी- नेत्यांची मुले वाईट संगतीने त्यांची वाट चुकली मात्र, अरुणकाका त्याबाबत समाधानी राहिलेत! त्यांचा वाढदिवस महिनाभरापूव झाला. त्याआधी एका खासगी कार्यक्रमात काकांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी माझ्याशी नेहमीप्रमाणे दिलखुलास गप्पा मारल्या. माझा हात हातात घेत ते म्हणाले, ‌‘शिवाजीराव, पांडुरंगाची सेवा करत आलो आणि जे पाहिजे ते मला मिळत गेले. दोन्ही मुले- सुना संस्कारी निघाल्यात आणि समाजाची सेवा करताहेत, यातच मी समाधानी असल्याचे सांगणारे काका त्यामुळेच तर अजातशत्रू म्हणून ओळखले जात होते. स्वत:सह त्यांच्या दोन्ही मुलांकडे आपल्या कार्यकर्त्यांची फौज आहेच तसेच जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर आहे. म्हणूनच तर आज नगर शहर म्हणजे जगताप परिवार हे समीकरण तयार झाल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.

जगताप परिवाराला राजकारणात अनेक विरोधक असले तरीही त्यांनी त्यांचा कधी दुस्वास केला नाही. मात्र जर कोणी अंगावर आले तर त्यांना कधी सोडलेही नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर संग्राम जगताप यांनी थेट हिरव्या गुलालाला हात घातला अन्‌‍ भगव्याशी पाईक असल्याचे ठासून सांगितले. संग्राम जगताप यांची ही भूमिका मारक ठरु शकते असे अरुणकाकांना मी सहज बोललो होतो. मात्र, त्यावर अरुणकाकांनी अत्यंत शांत अन्‌‍ संयमी स्मीत करत दिलेले उत्तर हे वडिलकीचा आदर्श देणारेच होते. ‌‘शिवाजीराव, संग्राम आता निर्णय घ्यायला मोकळा झालाय! तीन वेळा नगरकरांनी त्याला विधानसभेत पाठवलेय. त्याला चांगलं काय आणि वाईट काय हे आता कळू लागलंय! त्याचे निर्णय चुकणार नाहीत‌’. काळ सरला अन्‌‍ संग्राम जगताप यांना त्याच हिंदुत्वाच्या मुद्यावर संपूर्ण जिल्हाभरातून मागणी होऊ लागली. मढीची होळी, श्रीरामपूरचा जातीय तणाव, कर्जतमधील घटना या घटना ठळक दिसत असल्या तरी पडद्याआड हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या संग्राम जगताप यांना अनेकांनी पाहिले अन्‌‍ अनुभवले! शिवाजीराव, पद मिरवण्यासाठी नसते. काम करण्यासाठी असते. जनतेचे आशीर्वाद मी घेतले अन्‌‍ तेच आशिर्वाद जनता आता सचिन आणि संग्रामला देत आहे. यापेक्षा एका बापाला वेगळे समाधान ते काय असते, असं बोलताना अरुणकाकांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या निर्माण झालेल्या भावना बऱ्याच बोलक्या होत्या. जिल्ह्याचाच विचार केला तर अनेक नेते- पुढाऱ्यांचं पुढारपण त्यांच्या वाया गेलेल्या पोरांमुळेच गेले हे सांगण्याची गरज नाही. मात्र, काका त्याला अपवाद ठरले. ‌‘आपण कोणाचं वाईट केलं नाही, परमेश्वर माझं वाईट करणार नाही‌’, हे सांगताना काका कृतकत्य झाल्यासारखे अनेकदा दिसले. त्याच काकांना अशी अकाली एक्झीट मिळेल असे कधीच वाटले नाही.

अभ्यासू पण आक्रमक व्यक्तिमत्त्व असलेल्या सचिन आणि संग्राम यांच्यात अरुणकाकांचे गुण आहेत. संग्राम जगताप यांची विधानसभेतील भाषणे ऐकताना काकांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिदतील भाषणांची आठवण होते. विरोधकाला आपलेसे करणारे आणि प्रसंगी त्याच्या घरी जाऊन त्याचाच पाहुणचार घेणाऱ्या काकांची तीच कार्यपद्धती सचिन आणि संग्राम या दोघांकडेही दिसते. विशेषत: जनसामान्यांच्या प्रश्नांची मांडणी करताना वास्तव मांडून सरकारचे लक्ष वेधून घेण्याची वेगळी खासियत संग्राम जगताप यांनी अलिकडे विकसीत केल्याचे दिसते. सर्वपक्षीय मित्र परिवार आणि राजकारण्यांशी, नेत्यांशी अरुणकाका यांनी कायमच मित्रत्वाचे संबंध जपले. विशेषत: विधान परिषदेत दोनदा संधी मिळाल्यानंतर नगर शहरापुरते मर्यादीत आणि सिमीत राहिलेले अरुणकाका यांनी राज्यभरात अनेक दिग्गजांचा गोतावळा तयार केला. त्याच गोतावळ्यात रमताना कुटुंबात कणखर कुटुंबप्रमुख दिसणारे अरुणकाका प्रत्यक्षात हळवे होते. राजकारणात मुलं मोठ्या पदावर गेली असली तरी सचिन आणि संग्राम या दोघांशीही त्यांचा असणारा संवाद आणि दोघांशीही मुलापेक्षा मित्रत्वासारखे वागणारे अरुणकाका अनेकांनी अनुभवले.

नगर शहराच्या राजकीय जडणघडणीचा, राजकीय पक्ष आणि त्या पक्षांच्या असित्वाचा विचार केला तर आज अरुणकाका यांचा स्वत:चाच एक राजकीय विचार दिसून आला आणि तोच त्यांचा पक्ष! अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी नगरमध्ये आहेत. त्यांचे अस्तित्वही आहे. मात्र, अरुणकाका जगताप ह्या विचाराचा, त्यांचे समर्थन करणारा वेगळा परिवार नगरमध्ये निर्माण झाला आहे. शंभरपैकी सत्तरजणांकडून अरुणकाका जगताप हाच आमचा राजकीय पक्ष असे उत्तर मिळत असेल तर याचा अर्थ काकांनी नगर शहरात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केलेय आणि त्याच्या सोबतीने कष्ट घेतले आणि घेत आहेत ते संग्रामभैय्या! अरुणकाका कुणाच्या पुढे पुढे करताना दिसले नाहीत आणि त्यांना तसे करणे कधी जमलेही नाही. स्वत: शरद पवार तर पक्षाच्या कार्यक्रमात अनेकदा अरुणकाकांना नावाने हाक मारून पुढे बोलावताना दिसले. खरेतर असे अनेकदा घडले. स्वत:चा आब राखून काम करताना मी त्यांना लोकमत, देशदूत आणि आता नगर सह्याद्री या प्रवासात अनुभवले आणि पाहिले. भेटायला आलेल्या लोकांचे ते प्रश्न समजावून घेतात. दुसऱ्याशी नेहमी ते आदराने बोलायचे. शिवसेनेचे तत्कालीन उपनेते स्व. अनिल राठोड यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी याच अरुणकाकांनी चितळे रस्त्यावर धाव घेतली तेव्हा संपूर्ण नगर शहरालाच नव्हे तर जिल्ह्याला अरुणकाकांचे अँग्री यंग मॅन असे दर्शन घडले होते.

नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार असा राजकीय प्रवास केल्यानंतरही काकांचे पाय कायमच जमिनीवर राहिले! जनतेशी असणारी नाळ त्यांनी जशी कधीच तुटू दिली नाही तशीच त्यांनी पंढरपूरची वारी देखील कधीच चुकवली नाही. आमदारकी, खासदारकीच्या पलिकडे काका गेले असताना आता पंढरीच्या वारीतील एक वारकरी कमी झाला! मात्र, या वारकऱ्याने हजारो वारकरी तयार केले हेही तितकेच खरे! काका गेले असले तरी त्यांनी मोठी शिदोरी मागे ठेवली आहे. सचिनभाऊ आणि संग्रामभैय्या यांना ही शिदोरी बरेच काही देऊन जाणार आहे. दोघांच्याही सोबतीला अनेक सवंगडी असले तरी काकांनी जपलेली कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फौज जगताप बंधूंना काका देऊन गेलेत. जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर त्यांच्या सोबत राहील यात शंका नाही. काका, समाजाचं आपण देणं लागतो ही भावना काकांनी जपली आणि तीच भावना त्यांची दोन्ही मुले जपत असताना काकांची अकाली एक्झीट झाली. काका तुम्ही आज आमच्यात नसलात तरी खरंच तुम्ही भाग्यवान राहिलात! तुम्ही पाहिलेले नगरविकासाचं स्वप्न संग्रामभैय्या नक्कीच पूर्ण करतील आणि जोडीला गोरगरीबांच्या डोळ्यातील अश्रू पुसतील! काका, ‘नगर सह्याद्री’ परिवाराच्या वतीने आपणास भावपूर्ण श्रद्धांजली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...