पारनेर तालुक्यात कार्यशाळा; १५ ऑगस्टला ‘बालविवाहमुक्त गाव’ ठराव संमत होणार
पारनेर । नगर सहयाद्री
बालविवाहासारख्या सामाजिक संकटाला संपवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पारनेर तालुक्यात पंचायत समिती कार्यालयात जागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. स्नेहालय संस्थेचा ‘उडान प्रकल्प’, महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाइन 1098, तसेच तालुका व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम पार पडला. कार्यशाळेत सहभागी सर्व मान्यवरांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये माझे गाव बालविवाहमुक्त गाव हा ठराव संमत करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन करण्यात आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या पुढाकारातून उडान प्रकल्प जिल्ह्यात बालविवाहविरोधी जनजागृती करत आहे. कार्यशाळेत ज्येष्ठ अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी बालविवाहाचे केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामाजिक व राष्ट्रीय पातळीवर होणारे दुष्परिणाम विशद केले.
बालविवाह थांबवण्याची किल्ली ही मंडपात नाही, ती शाळेच्या वर्गात आहे, असे सांगत त्यांनी शिक्षण, जनजागृती आणि समाजाची सामूहिक जबाबदारी यावर भर दिला. प्रवीण कदम (उडान प्रकल्प व्यवस्थापक) यांनी कायदेशीर बाजूंवर सखोल मार्गदर्शन केले. सर्व कायद्यांची माहिती दिली. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी सर्जेराव शिरसाठ यांनी ग्रामस्तरावरील बाल संरक्षण समित्यांची भूमिका, त्यांची जबाबदारी आणि कामकाजाविषयी माहिती दिली.
चाईल्ड हेल्पलाइनचे जिल्हा समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी 1098 या हेल्पलाइनची कार्यप्रणाली, त्वरित प्रतिसाद व संरक्षक कारवाई याबाबत अनुभवसिद्ध माहिती दिली. कार्यशाळेला पारनेर तालुक्याचे गटविकास अधिकारी दया पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे, गट शिक्षणाधिकारी श्री. कांतीलाल ढवळे, तसेच महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती जयश्री उदावंत, श्रीमती कमल राऊत, पत्रकार भगवान गायकवाड आदींसह शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.