अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
महानगरपालिकेने सोमवारी सकाळपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. झेंडीगेट परिसरात प्रभाग समिती कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कारवाई सुरू केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पत्र्याचे शेड, टपऱ्या, कत्तलखान्याची दोन अनधिकृत बांधकामे कारवाई करून हटवण्यात आली.
शहरात व उपनगर परिसरात अतिक्रमण मोहिमेसाठी महानगरपालिका प्रशासनाने महिनाभराचे नियोजन केलेले आहे. त्याची माहितीही वेळापत्रकासह सार्वजनिक करण्यात आलेली आहे. यापूर्वीही मागील एक – दोन महिन्यात महानगरपालिकेने अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. गेल्या दोन महिन्यात ४८५ अतिक्रमणे व ७५५ हून अधिक अनधिकृत बॅनर, होर्डिंग हटवण्यात आले आहेत. आता पुन्हा शहरामध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी झेंडीगेट परिसरात अनधिकृत पणे बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड, टपऱ्या कारवाई करून हटवण्यात आल्या. यात दोन अनधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. महानगरपालिकेने दिलेल्या वेळापत्रकानुसार व नियोजनानुसार अतिक्रमण कारवाई सुरू राहणार आहे. नागरिकांनी अतिक्रमण केले असल्यास, ते तात्काळ काढून घ्यावे. अनधिकृत कत्तलखान्यावर कारवाईबाबत पोलिस प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कत्तलखान्यावरही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
अनधिकृत कत्तलखाने तत्काळ काढून घ्यावेत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे. दरम्यान, यापुढे अतिक्रमण हटाव मोहीम केवळ कार्यालयीन वेळेत सीमित न राहता पहाटे सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत चालूच राहणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.