अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय घेऊन एका २६ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पती रविंद्र रघुनाथ वाघ, सासू बबनबाई रघुनाथ वाघ, दीर अंबादास रघुनाथ वाघ व जाऊ रुक्मिणी अंबादास वाघ (सर्व रा. नांदुर निंबा दैत्य, ता. पाथर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे लग्न २०१५ मध्ये रविंद्र वाघ याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही दिवस सासरच्या लोकांनी तिला चांगले वागवले. मात्र, काही वर्षांनी पती रविंद्र हा दारू पिऊन घरात धिंगाणा घालून, तिला आणि मुलाला सतत मारहाण करू लागला.
यादरम्यान, सासू बबनबाई हिने “लग्नात राहिलेले हुंड्याचे पैसे कधी देणार?” अशी विचारणा करत छळ सुरू केला. पीडितेचे वडील तिला सणासुदीसाठी माहेरी नेण्यासाठी आले असता, “आधी हुंड्याचे पैसे घेऊन या, मगच मुलीला घेऊन जा,” असे म्हणून त्यांना परत पाठवण्यात आले.
पतीनेही चारित्र्यावर संशय घेऊन पीडितेला मारहाण केली. या त्रासाला कंटाळून पीडिता जानेवारी २०२५ पासून मुलासह वेगळी भाड्याने राहू लागली. याचा राग मनात धरून सासू व जाऊने फोनवरून शिवीगाळ करत, “आम्ही त्याचे दुसरे लग्न लावून देऊ,” अशी धमकी दिली. तसेच, पतीने तिला मारण्यासाठी मुले पाठवून घरमालकालाही धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पीडितेने यापूर्वी भरोसा सेल येथेही तक्रार दिली होती, मात्र तेथे आरोपींनी दाद दिली नाही. अखेर, पीडितेने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.



