मुंबई | नगर सहयाद्री
राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाने जोर धरला असून, पुढील २४ तासांतही जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक असून, नदी-नाल्यांना पूर येत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टीसह सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत गेल्या काही तासांत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. पुणे शहरातच मागील दोन महिन्यांत तब्बल ५११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ही आकडेवारी शहराच्या वार्षिक सरासरीच्या ७०–८० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. नागपूर आणि परिसरात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला होता, तर गुरुवारी संध्याकाळपासून पुन्हा रिपरिप सुरू झाली आहे. नागपूरसह भंडारा जिल्ह्यालाही येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.