अकोले । नगर सहयाद्री:-
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात चौथ्या दिवशीही पावसाचा जोर टिकून आहे. जोरदार वारा आणि पावसाने परिसरातील जनजीवन गाठून गेले असून जनजीवन विस्कळीत झाली आहे. पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्या रतनवाडी आणि घाटघरमध्ये श्रावणसरी अधूनमधून जोरदार बरसत असल्याने धरणात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत तब्बल 932 दलघफू पाणी जमा झाले.
त्यामुळे प्रवरा नदीत विसर्ग माठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 9671 दलघफू (87.61 टक्के) होता. पाण्याची आवक कमी झाल्याने विसर्ग 4806 क्युसेसने सुरू होता. 1 ऑगस्टला धरणातील पाणीसाठा 92 टक्के करण्यात येणार आहे. निळवंडेतही नवीन पाण्याची आवक सुरू असल्याने पाणीसाठा 7408 दलघफू (88.95 टक्के) झाला होता. विसर्ग 8145 क्युसेसने सुरू होता.
मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. जोरदार वारा आणि पावसाने परिसरातील जनजीवन गाठून गेले आहे. पावसाच्या सातत्याने मुळा नदी दुथडी वाहत आहे. सकाळी सहा वाजता कोतूळ येथून मुळा धरणाकडे 13,836क्यूसेने आवक सुरू होती तर सायंकाळी सहा वाजता 6592 क्यूसेसने आवक सुरु होती. त्यामुळे 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणाकडे पाण्याची दमदार आवक होत आहे.
काल रविवारी रात्री 12 तासांत सुमारे एक टीएमसी च्या जवळपास (944 दशलक्ष घनफूट) एवढ्या विक्रमी नवीन पाण्याची आवक झाली तर काल सोमवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या बारा तासाच्या अंतरात अर्धा टीएमसी एवढ्या विक्रमी पाण्याची नवीन आवक झाली. यामुळे मुळा धरणाचा पाणीसाठा काल सायंकाळी सहा वाजता 21 टीएमसीचा टप्पा पूर्ण केला आहे. 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात काल सायंकाळी 6 वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा 21706 दशलक्ष घनफूट पर्यंत पोहोचला असून मुळा धरण 83 टक्के भरले आहे.