अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
रूईछत्तीसी गणातील गावामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत चालू करावा. या मागणीसाठी रुईछत्तीसी गणातील आठ ते दहा गावातील शेतकऱ्यांनी दहीगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या कित्येक दिवसापासून या भागात विजेचा लपडांव चालू आहे. गहू, कांदा, हरभरा पिकांना पाणी नसल्यामुळे पिके जळू लागली आहे. आठ तासातील दोन तास ही विद्युत पुरवठा नसतो. या संदर्भात या परिसरातील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले होते.
मात्र वितरण कंपनीने यांची दखल न घेतल्यामुळे बुधवार (दि.5) दहिगाव, साकत, रुईछत्तीसी, वाटेफळ, शिराढोण, वडगाव तांदळी, तांदळी वडगाव या गावातील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता दहीगाव येथे रास्तारोको आंदोलन केले. एक तास आंदोलनामुळे नगर सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरण कंपनीच्या सावळ्या गोंधळावर सडकून टीका केली. दोन दिवसात या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत चालू होईल असे लेखी आश्वासन वितरण कंपनीचे उपअभियंता यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, रमेश भांबरे, मधुकर म्हस्के, सुनिल म्हस्के, महेश म्हस्के, जयंत शिंदे, उध्दव अमृते, रवि अमृते, बाबा अमृते, बाळासाहेब बोठे, अनशा बापु म्हस्के, शिवहरी म्हस्के सह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नगर तालुका पोलीस ठाण्याचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. महावितरणचे अधिकारी सपकाळ यांना शेतकऱ्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचा धंदा ः हराळ
सोलापूर महार्गावर असणाऱ्या पथदिव्यांना लाईट दिली. 24 तास या पोलवर विद्युत पुरवठा असतो. दहिगावमध्ये सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करुन दिली. मात्र येथे वेळकाढूपणा करत आहे. सोलरसाठी शेतकऱ्यांनी चार महिन्यापूव अर्ज केले. मात्र अद्याप कुणालाही सोलर दिले नाही. यांच्याकडे सोलर उपलब्ध नाही. शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचा धंदा सुरू असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब हराळ यांनी जोरदार हल्लाबोल केला.