संगमनेर । नगर सहयाद्री
संगमनेरमधील कीर्तनात झालेल्या राजकीय गोंधळानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तापल्या आहेत. संग्रामबापू भंडारे महाराज यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांवर टीका करताना, जीभ घसरली. नथूरामजी गोडसे होण्याची भाषा वापरली. भंडारे महाराज यांच्या भाषेवरून राज्यातील संपूर्ण काँग्रेस, थोरातांसाठी मैदानात उतरली आहे. तसेच थोरातांचे भाचे तथा नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांचा टीकेला प्रत्युतर दिले आहे.
आमदार सत्यजीत तांबे मामा थोरातांबरोबर मैदानात येत, तथाकथित कीर्तनकाराची टीका ही राजकीय तर आहेच, पण संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे, असे सुनावणारे ट्विट केलं आहे. सहकार, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेरचे नाव बदनाम करण्याचा काही घटना मागील काळात सातत्याने सुरू असल्याकडे देखील आमदार तांबेंनी लक्ष वेधलं. सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब थोरातसाहेबांवर टीका करताना विरोधक सुध्दा जपून शब्द वापरतात. त्यामुळे संत-महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात स्वतःला कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या एका उध्दट व्यक्तीने त्यांच्या विषयी जे काही बोलले ते महाराष्ट्रातील कोणत्याही वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांना आवडलेले नाही.
सहकार, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेरचे नाव बदनाम करण्याचा घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहेत. तशा त्या सुरू करण्यात आल्यात. या घटना फक्त राजकीय नाहीत, किंवा फक्त थोरातसाहेबांशीच संबंधित नाही, मध्यंतरी संगमनेरचे नाव देशभर प्रसिद्ध करणाऱ्या एका उद्योगपतीला त्याने ‘होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे’, बोलल्याबद्दल फार वाईट भाषेत टीका सहन करावी लागली’, याकडे देखील तांबेंनी लक्ष वेधलं.
संगमनेरची विकासाची वाटचाल सांगताना सत्यजीत तांबेंनी, ‘संगमनेरच्या सहकारी व सहकारी बँकांमधील ठेवी आज 7000 कोटींच्या घरात आहेत, संगमनेरात रोज 9 लाख लिटर दूध तयार होते, संगमनेरमधील दोनच गावात कुक्कुटपालनातून रोज 7 लाख अंडे तयार होतात, संगमनेर कारखाना राज्यातील एक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. संगमनेरमध्ये 5 मेडिकल कॉलेज आहेत, ज्यातील चार बाळासाहेब थोरातांच्या विरोधकांचे आहेत, म्हणजेच येथे द्वेषाचे राजकारण नाही, संगमनेरात सगळ्या शिक्षण संस्था मिळून 25000 मुले-मुली उच्च शिक्षण घेतात.
प्रवरा नदीला पाणी नसतांना संगमनेर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती, आता निळवंडे धरणातून 24 तास स्वच्छ पाणी भेटते’, याकडे आमदार तांबेंनी लक्ष वेधलं. हे काय उगाच झालेले नाही, पर्जन्य छायेच्या भागात असलेला व एके काळचा दुष्काळी तालुका आज सुजलाम्-सुफलाम् झाला, यात स्वातंत्र्य सेनानी (कै.) भाऊसाहेब थोरात व त्यांच्या नंतर बाळासाहेब थोरात यांचे प्रचंड योगदान आहे, जे कोणीही शहाणा माणूस नाकारू शकत नाही. कालच्या तथाकथित कीर्तनकाराची टीका ही राजकीय तर, आहेच पण संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे’, अशी चिंता आमदार तांबे यांनी म्हटले. संगमनेरची स्वाभिमानी जनता हे कधीही सहन करणार नाही! असाही इशारा आमदार तांबे यांनी दिला.