अहमदनगर। नगर सहयाद्री:-
नगर तालुक्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला निंबळक-चास-खंडाळा ते वाळुंज-नारायणडोह बारदरी-खांडके- कापूरवाडी-पिंपळगाव उज्जैनी-पोखर्डी हा रस्ता दर्जोन्नत करण्यात येऊन त्यांचे राज्य मार्गात रूपांतर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत आदेशही निर्गमित करण्यात आले आहे. या रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे, अशी माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.
आमदार तनपुरे म्हणाले, नगर तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक एक हा ६४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. बाहतुकीच्या प्रमाणात रस्त्याची रुंदी वाढविणे आवश्यक असल्याने त्याचबरोबर त्याचा दर्जा सुधारणे आवश्यक होते. त्यासाठी सदर रस्त्यांचे राज्य मार्गात रूपांतरित करणे गरजेचे होते. याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.
वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे शासनाने निंबळक-चास- खंडाळा ते वाळुंज- नारायणडोह, बारदरी-खांडके- कापूरवाडी- पिंपळगाव उज्जैनी- पोखर्डी या ७४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यास राज्यमार्ग क्र. ४८४ म्हणून दर्जेन्नत करण्यास मान्यता दिलेली आहे. याबाबतचे शासन आदेशही निर्गमित केलेले आहे. सदर रास्ता राज्यमार्ग म्हणून दर्जेन्नत झाल्यामुळे त्याच्या विकासाकरिता प्राधान्याने निधी उपलब्ध होऊन रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी व त्याचा विकास करण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.