मुंबई | नगर सह्याद्री
अहिल्यानगर मधल्या महानगरपालिकेतला साडेचारशे कोटींचा रस्त्यांच्या कामांचा भ्रष्टाचार ठाकरे शिवसेनेने बाहेर काढला. ते प्रकरण आता न्यायालयात गेलं आहे. हे प्रकरण काढलं म्हणून आमच्या शहर प्रमुख किरण काळेंना अटक केली गेली. अहिल्यानगर मध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली. या सगळ्या वरच लक्ष विचलित करण्यासाठी काहींना दंगली घडवायच्या आहेत. हे जे काही बाडगे हिंदुत्ववादी आहेत जे आज टिळा लावून फिरत आहेत, ते अशा प्रकारच्या दंगली अहिल्यानगर मध्ये घडवत आहेत, अशी टीका शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केली आहे.
ठाकरे शिवसेना शहर प्रमुख किरण काळेंनी अहिल्यानगर मनपातील बाहेर काढलेला रस्ते घोटाळा, धार्मिक तेढ, तणावपूर्ण परिस्थिती, अतिवृष्टी याबाबत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खा. राऊत बोलत होते. ते म्हणाले, अनेक गोष्टी चर्चेतून सुटू शकतात. पण प्रशासनाला आदेश आहेत की तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे निर्णय घ्या. प्रश्न सोडवू नका. पोलिसांनी अशा प्रकारचं वर्तन करणं हे कायदा, सुव्यवस्थेसाठी योग्य नाही.
खा. राऊत म्हणाले, मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर सरकारचा बोजवारा उडाला आहे. तो झाकण्यासाठी भारतीय जनता पाटच्या उप कंपन्या या दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातलं वातावरण आता दंगलीं पेक्षा पूर परिस्थिती, अतिवृष्टी यावर चर्चा करण्याची गरज असताना त्याच्यावरचे लक्ष विचलित करण्यासाठी, सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यात कसं अपयशी आहे यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सुरू आहे.
ते बोगस, भंपक, ढोंगी हिंदुत्ववादी
खा. राऊत पुढे म्हणाले, हा देश हिंदूंचा आहे. या देशामध्ये हिंदुत्ववाद राहणार. प्रभावीपणे राहणार. हे आम्ही सांगतो आहोत. या हिंदुत्ववाद्यांनी जरी दंगली घडवल्या, मात्र त्यांनी भारत – पाकिस्तान सामन्याला विरोध नाही केला. त्या सामन्याचं मानधन पाकिस्तानी खेळाडूंनी तिथल्या एका प्रमुख दहशतवाद्याच्या संघटनेला दिल आहे. मसूद अझहरला दिल आहे. या गोष्टींना विरोध करण्याची यांच्याच हिम्मत नाही. हे जे काही आता महाराष्ट्रात अहिल्यानगरसह इतरत्र दंगली घडवत आहेत हे बोगस आणि भंपक हिंदुत्ववादी आहेत. ढोंगी लोकं आहेत.