नागपूर / नगर सह्याद्री –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दंगलखोरांना सज्जड दम दिला. दंगलीमधील एकालाही सोडणार नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नागपूर दंगलीमधील एकालाही सोडले जाणार नाही, जिथे बुलडोझर चालवण्याची गरज असेल तिथे चालवला जाईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
नागपूरमधील महाल परिसरात सोमवारी हिंसाचार उफळला होता. दगडफेक अन् जाळपोळीच्या घटनेमुळे नागपूर होरपळून निघाले होते. पोलिसांकडून याप्रकरणात तात्काळ कारवाई करत अनेकांना ताब्यात घेण्यात आले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये आले होते. त्यानी नागपूरमधील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर दंगलखोरांना इशारा दिला. महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाला, पण प्रसारमाध्यमांनी दाखवलं तसा कोणताही अभद्र व्यवहार झाला नाही. पोलीस आयुक्तांनी तपास केला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
एकालाही सोडणार नाही –
हिंसाचाराच्या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. ज्या भागात दंगल घडली, त्या भागातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. जे जे दंगलखोर दिसत आहेत, त्या सर्वांना अटक केली जात आहे. एकालाही सोडलं जाणार नाही, सर्वांवर कारवाई केली जाईल, आतापर्यंत १०४ दंगलखोरांना अटक केली आहे, त्यामध्ये १२ अल्पवयीन आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सोशल मीडियात अफवा पसरवल्या –
नागपूर हिंसाचाराबाबत विधानसभेत मुद्दे मांडले आहेत. आज आयुक्तांसोबत चर्चा केली. आढावा घेतला. औरंगजेब कबर जाळण्यात आली, त्यावर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. कुराण आयतची चादर जाळली असा भ्रम सोशल माध्यमातून पसरवला गेला. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी हिंसाचार भडकला होता. पोलिसांनी पाच तासात दंगल आटोक्यात आणली, असे फडणवीस यांनी सांगितले.
दंगा भडकावणाऱ्या पोस्ट करणारेही सह आरोपी –
हिंसाचार झाल्यानंतर सायबर पोलिसांनी सोशल मिडिया तपासून काढला आहे. पोलिसांना दंगा भडकावणाऱ्या अनेक पोस्ट आढळल्या आहेत. दंगा भडकवणाऱ्या पोस् टाकलेल्यांना सह आरोपी केले जाणार आहे. आतापर्यंत पोलिसांकडून ६८ पोस्ट डिलिट करण्यात आल्या आहेत. अजून तपास सुरू आहे. भडकवणारे पोस्ट करून अफवा पसरवली. लोकांना पॅनिक केले, अशा सर्व लोकांवर कारवाई होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
दंगलखोरांकडून पैसे वसूल केले जातील –
दंगलीत झालेली नुकसान भरपाई चार दिवसांत सर्वांना दिली जाईल. सोमवारपासून नागपूरमधील दंगलग्रस्त भागात निर्बंध घातले आहेत, त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. पण आजपासून हळू हळू सर्व सुरू केले जाईल. हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून करण्यात येईल. त्यांनी पैसे दिले नाहीत, तर प्रॉपर्टी विकली जाणार आहे. दंगलखोरोनां सहन केले जाणार नाही, अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून कडक कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.