मुंबई / नगर सह्याद्री –
विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. विरार पूर्वेतील विजय नगर परिसरात घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर ३६ तासांनंतर आणखी दोन मृतदेहांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत २६ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. तर आत्तापर्यंत १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मंगळवारी रात्री विरार पूर्वेतील विजयनगर परिसरात भीषण दुर्घटना घडली. रमाबाई अपार्टमेंटचा इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत अनेक कुटुंबे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून मदत व बचावकार्य राबवलं जात आहे. जेसीबीसारखे यंत्रे घटनास्थळी पोहोचू शकत नसल्यानं ढिगारा हटवण्यात अडथळे निर्माण झाले. मात्र, दुपारनंतर इमारतीच्या शेजारील चाळी रिकाम्या करून काही भाग पाडण्यात आला आणि त्यामुळे बचावकार्यास वेग मिळाला.
एनडीआरएफचे रेस्क्यू ऑपरेशन दुसऱ्या दिवशीही सुरूच असून, आतापर्यंत २६ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. यापैकी १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ९ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत ओमकार जोईल हे व्यक्ती बेपत्ता होते. त्यांचा मृतदेहही सापडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जर अजूनही कुणाचे नातेवाईक किंवा ओळखीचे व्यक्ती बेपत्ता असतील, तर त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावी, असं आवाहन विरार पोलीस नागरिकांना करत आहेत.
दरम्यान, लक्ष्मण सिंग (२६ वर्ष), आरोही ओंकार जोवील (२४ वर्ष), उत्कर्षा जोवील (१ वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. अजून बाकी मृतांचे नावं समोर आलेली नाहीत. तर प्रमिला प्रभाकर शिंदे (५० वर्ष), प्रेरणा शिंदे (वर्ष २०), प्रदीप कदम (वय ४०), जयश्री कदम (वय ३३), मिताली परमार (वय २८), संजय स्वपंत सिंग (वय २४), मंथन शिंदे (वय १९), विशाखा जोवील (वय २४), प्रभावकर (वय ५७) अशी दुर्घटनेतील जखमींची नावे आहेत.