अहिल्यानगर। नगर सहयाद्री
महानगरपालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना लवकरच जाहीर होणार आहे. मागील आठवड्यात मातोश्री येथे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शहरप्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष, शिव-शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरे शिवसेना आणि रिपाइं (गवई गट) यांच्यामध्ये आघाडी बाबत खलबतं सुरू झाली आहेत. ठाकरे सेनेचे शहरप्रमुख किरण काळे आणि रिपाइं (गवई गट) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली आहे.
यावेळी कामगार सेनेचे विलास उबाळे, केडगाव शिवसेनेचे प्रतीक बारसे, युवा सेनेचे आकाश आल्हाट, सामाजिक न्याय सेनेचे विकास भिंगारदिवे, रिपाइं अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुलामअली शेख, जिल्हा कार्याध्यक्ष नईम शेख, शहर जिल्हाध्यक्ष अजीम खान, शहर उपाध्यक्ष निजाम शेख, जिल्हा उपाध्यक्ष जमीर सय्यद, शहर उपाध्यक्ष अरबाज शेख, भिंगार शहराध्यक्ष स्वप्निल साठे, शहर सचिव आफताब बागवान, युवक शहर उपाध्यक्ष योहान चाबुकस्वार, युवक शहर सचिव हुसेन चौधरी, ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष विल्सन रुकडीकर आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महायुती विरुद्ध शहर विकास आघाडीच्या चर्चा सुरू असल्या तरी देखील अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. महाविकास आघाडीचे देखील चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र ठाकरे शिवसेनेने मनपा निवडणुकीसाठी आता कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. स्वबळावर लढायचे की आघाडी करून याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे आदेश मुंबईत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शहर शिवसेनेला दिले होते. त्यानंतर ठाकरे शिवसेना आणि रिपाइं गवई गट मनपा निवडणुकीसाठी आघाडी करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप समोर आलेली नाही. मात्र मातोश्री येथे ठाकरे, शिवसेना नेते तथा राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या समवेत शहरप्रमुख किरण काळे यांनी रिपाइंचे शहराध्यक्ष म्हस्के यांची चर्चा घडवून आणली होती. त्या भेटीचे फोटो देखील समाज माध्यमांमधून वायरल झाले होते. माध्यमांमधून तशा बातम्या पुढे येत होत्या. त्यानंतर शहर पातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षप्रमुख ठाकरे यांच्या आदेशावरून शहरप्रमुख काळे यांनी शिवसेना बळकट करण्याचे काम जोमाने सुरू केले आहे. आगामी काळात ठाकरे शिवसेना रिपाइं (गवई गट) आघाडी झाल्यास मनपा निवडणुकीत रंगत येणार एवढे मात्र नक्की.