Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कानपूरचे रहिवासी शुभम द्विवेदी यांचा मृत्यू झाला. दोनच महिन्यापूर्वी शुभम यांचा विवाह झाला होता. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामुळे त्यांच्या कुटुंबालाच मोठा धक्का बसला आहे. मात्र दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यात आल्याचे बोलले जात असताना सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेबाबत मृत शुभमच्या कुटुंबीयांनी घडलेला प्रकार सांगितला आहे.
शुभम १७ एप्रिल रोजी त्याच्या कुटुंबातील ११ सदस्यांसह काश्मीरला गेला होता. २३ एप्रिल रोजी ते सर्वजण परत कानपूरला येणार होते, परंतु त्याच्या एक दिवस आधी म्हणजे २२ एप्रिल रोजी ही दुर्दैवी घटना घडली. शुभमच्या मेहुण्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंब त्याठिकाणी गेले होते. १८ एप्रिल रोजी संपूर्ण कुटुंबाने मोठ्या थाटामाटात साजरा केला आणि मग सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेले.
२२ एप्रिल रोजी शुभम पहलगाममध्ये त्याच्या पत्नीसोबत बसून मॅगी खात होता, तेव्हा एक अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आला. शुभमच्या पत्नीने कुटुंबातील सदस्यांना सांगितले की, त्या व्यक्तीने प्रथम शुभमचे नाव विचारले आणि नंतर त्याला कलमा म्हणण्यास सांगितले. शुभमने त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले, तेव्हा त्याने बंदूक काढून शुभमच्या डोक्यावर ठेवली आणि डोक्यात गोळी झाडली. त्याने शुभमच्या पत्नीला गोळी मारली नाही तर तिला धमकी दिली. तसेच, “जा आणि हे तुमच्या सरकारला सांग आम्ही काय केलं आहे” असे म्हटले.
घटनेच्या वेळी कुटुंबातील पाच सदस्य घोड्यावर स्वार होऊन डोंगरावर गेले होते तर उर्वरित सहा लोक खाली उपस्थित होते. या भयानक घटनेने संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकले आहे. शुभमचे काका मनोज द्विवेदी यांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली.”सरकारने आश्वासन दिले होते की काश्मीर खोऱ्यात आता कोणताही दहशतवाद नाही, म्हणून त्यांनी तिथे जाण्याचा निर्णय घेतला.
पण अशा घटना लोकांच्या मनात भीती निर्माण करतात आणि विश्वासाला तडा देतात.” असे म्हणत सरकारच्या धोरणावर ठपका ठेवला. मनोज द्विवेदी यांनी सरकारकडे दहशतवादाचे उच्चाटन करण्याची मागणी केली जेणेकरून सामान्य नागरिक निर्भयपणे पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतील. सरकारने अजूनही ठोस पावले उचलली नाहीत तर लोकांचा विश्वास तुटून जाईल, असे ते म्हणाले. शुभमच्या मृत्यूने आनंदी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.