राज्यातील 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्यांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
राज्यातील महापालिका, नगर पालिका आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यापाठोपाठच गुरुवार दि.12 रोजी राज्यातील 32 जिल्हा परिषद व 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे. 14 जुलैपासून प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू होणार असून 18 ऑगस्ट 2025 ला अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे.
सर्वेाच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसंदर्भात पावले उचलली आहेत. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभाग रचनेचे आदेश जारी केले आहेत. यामुळे अहिल्यानगर जिल्हा परिषदेसह राज्यातील इतर जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कामांना गती मिळणार आहे.
गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून अहिल्यानगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. गत निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेचे 73 गट तर पंचायत समित्यांसाठी 146 गण होते. दरम्यान ठाकरे सरकारच्या काळात गटांची संख्या वाढवून 85 गट व 170 गण करण्यात आले होते. परंतु, राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ठाकरे सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानेही गत निवडणुकीप्रमाणेच निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
गट 73 की 75
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 73 गट तर 146 गण होते. दरम्यान ठाकरे सरकारच्या काळात गटांची संख्या वाढवून 85 तर 170 गण करण्यात आले. राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ठाकरे सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. पूवप्रमाणेच निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशात अहिल्यानगर जिल्हा परिषदेसाठी 75 गट व 150 गण संख्या आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 73 की 75 गट होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम पुढीलप्रमाणे
14 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे
21 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करणे
28 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करणे
11 ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय घेणे
18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करणे
अगोदर निवडणुका मनपा की झेडपी?
चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हालचालींना वेग आला. नगरविकास विभागाने बुधवारी दि. 11 रोजी महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश संबंधितांना दिले व गुरुवारी प्रभाग रचनेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. तसेच गुरुवारीच राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 01 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर 18 ऑगस्टनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी केलेली प्रभाग रचना अंतिम होणार आहे. त्यामुळे राज्यात महापालिका की जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका अगोदर होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेसाठी असा आहे प्रभाग रचनेचा निवडणूक कार्यक्रम
11 ते 16 जून : प्रगणक गटाची मांडणी
17 ते 18 जून : जनगणनेची माहिती तपासणी
19 ते 23 जून : स्थळ पाहणी करणे
24 ते 26 जून : गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे
27 ते 30 जून : नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागहद्दी जागेवर जाऊन तपासणे
1 ते 3 जुलै : प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीच्या सह्या
4 ते 8 जुलै : प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठविणे
15 ते 21 जुलै: प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवणे
22 ते 31 जुलै : हरकतींवर सुनावणी घेणे
1 ते 7 ऑगस्ट : हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना आयोगाला पाठविणे
22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर : अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे