Weather Update:- भारतीय हवामान विभागाने (IMD) आगामी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. उत्तर भारत, ईशान्य भारत आणि देशाच्या काही भागांत तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
IMD नुसार, मार्च 2025 पासून उन्हाच्या तीव्रतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर भारत, ईशान्य भारत आणि बहुतेक राज्यांमध्ये सरासरी तापमानापेक्षा अधिक उष्णतेचा अनुभव येईल. उष्णतेच्या लाटा विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींना जास्त प्रभावित करू शकतात.
फेब्रुवारी 2025 मध्येही उष्णतेने उच्चांक गाठला होता. यंदाचा फेब्रुवारी महिना सरासरीपेक्षा जास्त गरम ठरला असून, 1901 पासूनचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उष्ण फेब्रुवारी ठरला आहे. तर कमाल तापमान 29.7°c नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा 1.49°c अधिक होते.
IMD ने आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि पूर्व राजस्थानमध्ये जोरदार वाऱ्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी आणि द्रव पदार्थांचे सेवन करा.घराबाहेर पडताना हलके आणि सुती कपडे परिधान करा. शक्य असल्यास उन्हाळ्याच्या काळात दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे टाळा. उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या परिणामांपासून वाचण्यासाठी सावधगिरी बाळगा.