मुंबई । नगर सहयाद्री
मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, हवामान विभागाने राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी व पुणे घाट परिसरात ‘डबल अलर्ट’ जारी करण्यात आला असून, पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) कोकण किनारपट्टीसाठी उंच लाटांचा इशारा दिला आहे. यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले असून, लहान नौकांची वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली आहे. रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
हवामान खात्याने पुणे घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. धो-धो पावसामुळे मुठा नदीची पातळी वाढत असून, शहर प्रशासन सतर्क झाले आहे. घाटमाथ्याच्या भागांमध्ये भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२१ आणि २२ जूनला कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या घाट परिसरातही जोरदार पावसाचा अंदाज आहे, ज्यामुळे ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
राज्य आपत्कालीन यंत्रणा सज्ज
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात मोठा बदल झाल्याचे हवामान विभागाचे निरीक्षण आहे.
पावसाचा पुढील अंदाज
कोकण व मध्य महाराष्ट्र : मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
मराठवाडा : काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता
विदर्भ : तुरळक ठिकाणी हलका पाऊस