Maharashtra Rain Update राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आज (ता. २१, ऑक्टोबर) राज्यात विविध भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
एकीकडे ऑक्टोबर हीट’चा चटका तर दुसरीकडे परतीच्या पावसाचा धुमाकूळ यामुळे नागरिकही हैराण झाले आहे. सकाळी ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशीच स्थिती काही भागात पाहायला मिळत आहे.
दरम्यान पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २१) वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाच्या माहिती नुसार, आज कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदुरबार, धुळे , जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.