संगमनेर | नगर सह्याद्री
नुकत्याच पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये संगमनेरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत 10 पदकं जिंकली असून, यामुळे संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढला आहे. या यशाबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांनी समाधान व्यक्त करत म्हटलं की, देशात संगमनेरचं नाव उंचावणाऱ्याचा आम्हाला अभिमान आहे.
ध्रुव ग्लोबल शाळेतील या खेळाडूंनी विविध योगासन प्रकारांमध्ये आपलं कौशल्य दाखवत पदकं जिंकली. रिदमिक पेअर (मुले) प्रकारात अंश मयेकर व रोहन तायडे यांनी प्रथम, तर आर्यन खरात व प्रणव साहू यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. रिदमिक पेअर (मुली) मध्ये रुद्राक्षी भावे व प्रांजल वन्हा यांनी प्रथम, तर तृप्ती डोंगरे व देवांशी वाकळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
आर्टिस्टिक पेअर (मुले) प्रकारात अंश मयेकर व रोहन तायडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तर आर्टिस्टिक सोलो (मुले) प्रकारात प्रणव साहू व आर्यन खरात यांनी तृतीय, तर मुलींच्या गटात प्रांजल वन्हा हिने द्वितीय, आणि रुद्राक्षी भावे हिने तृतीय क्रमांक पटकावला. आर्टिस्टिक पेअर (मुली) या प्रकारात प्रांजल वन्हा आणि रुद्राक्षी भावे यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपलं वर्चस्व सिद्ध केलं.या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे उद्योजक संजय मालपाणी यांचेही आमदार सत्यजीत तांबे यांनी विशेष अभिनंदन केले. या स्पर्धेत महाराष्ट्राने 58 सुवर्ण, 47 रौप्य, 53 कांस्य अशा एकूण 158 पदकांसह क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला.
27 पैकी 22 खेळांमध्ये राज्याच्या खेळाडूंनी पदकं जिंकत महाराष्ट्राची क्रीडा संस्कृती ठसठशीतपणे सादर केली. या यशामुळे मुलींच्या गटात ओव्हरऑल चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांक, तर मुले गटात द्वितीय क्रमांक मिळवण्याचा मान संगमनेरच्या खेळाडूंना मिळाला.क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांमधील आपल्या मुलांची ही प्रगती बघून आनंद झाला आहे. भारतात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही कामगिरी आशादायक आहे. नव्या पिढीतील युवकांनी या यशातून प्रेरणा घेत विविध खेळांमध्ये सहभागी व्हावं, अशी अपेक्षा आमदार तांबे यांनी व्यक्त केली.