राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
लोकसभा विधानसभा निवडणुका या नेत्यांच्या झाल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. यामध्ये आपणा महिला 50 टक्के आहोत. तुम्हा कार्यकर्त्या महिलांना वेगवेगळ्या पदांच्या खुर्च्यावर बसलेले पाहायला मला आवडेल. अहिल्यानगर मनापाचा पुढील महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल. आमदार संग्राम जगताप पुढील वेळेस बोलावतील त्यावेळेस महापौरांच्या दालनात चहा पाण्यासाठी बोलवावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले.
नगरमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आयोजिलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, आमदार संग्राम जगताप, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, रेश्मा आठरे, युवती काँग्रेसच्या अंजली आव्हाड आदींसह मोठ्या संख्येने अन्य महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी रूपाली चाकणकर यांंनी महिला संघटन व निवडणुका यावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या संग्रामभैय्याच्या निवडणुकीत आपण महिलांनी चांगले काम केले. वेळ पडली तर अरे ला कारे केले. या निवडणुकांमध्ये मतदान कसे वाढवायचे यासाठी आपण शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचला.आता आपली जबाबदारी आहे पक्ष कसा वाढेल हे पाहणे. आपण विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी काम करावे असे आवाहन करून त्या म्हणाल्या अजितददांनी लाडकी बहीण योजना आणली.
आता या लाडक्या बहिणींना सुरक्षितता व सक्षम करण्याची जबाबदारी आपली आहे. आपणास आमदार संग्राम जगताप यांचे सारखे चांगले नेतृत्व आहे, ते उत्तम काम करतात. संग्रामभैय्याकडे पाहिले की त्यांच्यापुढे सर्व पदे फिकी पडतात. प्रत्येकाला आपणासा वाटणारा हा आमदार आहे. पद न घेता माणूस किती मोठा होऊ शकतो हे त्यांच्याकडे पाहिले की लक्षात येते.
सर्वात मिसळणारा लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत वेगवेगळ्या नात्यांनी तो सगळ्यांमध्ये मिसळत असतो त्याचे मी कौतुक करते. यावेळी महिलांनी रूपाली चाकणकर यांचा सत्कार केला. अशोक सावंत, आमदार संग्राम जगताप, आशा निंबाळकर, रेश्मा आठरे, अंजली आव्हाड यांच्यासह अनेक महिलांनी मनोगते व्यक्त केली.