अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा पैसे देणाऱ्या अनेक कंपन्या अन त्यांचे घोटाळे आता समोर आले आहेत. जादा परताव्याचे आमिष देत या कंपन्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील नागरिकांचे करोडो रुपये कंपन्यांमध्ये गुंतवून घेतले, त्यानंतर थोडे दिवस परतावाही दिला. त्यानंतर मात्र या कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळल्याने, या कंपन्यांनी अहिल्यानगरमधील नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावला आहे.
श्रीगोंद्यात इन्फिनाइट बिकनफकडून कोट्यवधींची फसवणूक
शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवून इन्फिनाइट बिकनफ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, श्रीगोंदा पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नितीन अंबादास गांगर्डे (रा. मांदळी, ता. कर्जत) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधत शेअर बाजारात सुरक्षित गुंतवणूक व दरमहा 6 ते 8 टक्के परताव्याचे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून गांगर्डे यांनी इन्फिनाइट बिकनफ प्लॅटफॉर्मवर टप्प्याटप्प्याने एकूण 73 लाख 50 हजार रुपये गुंतवले.या गुंतवणुकीवर एप्रिल 2025 पर्यंत त्यांना एकूण 18 लाख 80 हजार 655 रुपयांचा परतावा मिळाल्यामुळे त्यांनी अधिक रक्कम गुंतवली. मात्र मे 2025 पासून परतावा थांबवण्यात आला. विचारणा केली असता, आरोपींनी तांत्रिक अडचण आहे, वेबसाईटचे अपग्रेडेशन सुरू आहे अशी कारणे देत वेळ मारून नेली. जून महिन्यापर्यंतही परतावा न मिळाल्यामुळे फसवणुकीचा संशय बळावल्याने गांगर्डे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार श्रीगोंदा पोलिसांनी तत्काळ तपास करून या आर्थिक फसवणुकीप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या तक्रारदारांसारखे अनेक लोकांकडून त्यांनी रक्कम जमा केल्याची चर्चा असून हा घोटाळा करोडोंचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सुप्यातील कंपनीचा हजार कोटी रुपयांना गंडा
पारनेर तालुक्यातील सुपा येथील एका कंपनीने दामदुप्पटसह जादा परताव्याचे आमिष दाखवून नगर व पुणे जिल्ह्यातील शेकडो गुंतवणकदारांना एक हजार कोटी रुपयांना गंडा घातला आहे. या कंपनीमालकाने दुबईला धूम ठोकली असल्याची चर्चा आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून महिन्याला गुंतवणुकीवर 10 ते 12 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून या कंपनीने सुरुवातीला गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतविल्यास महिना 10 ते 12 हजार रुपये देऊन हजारो कोटी रुपये एजंटच्या माध्यमातून गोळा केले; मात्र आता दोन महिन्यांपासून व्याज बंद झाले; तसेच गुंतविलेले पैसेही मिळत नसल्याने गुंतवणूकदार चिंताग्रस्त बनले आहेत. गेल्या दोन वर्षात दामदुप्पट किंवा जादा परताव्याचे आमिष दाखवून तीन प्रमुख कंपन्यांनी आपले कार्यालय थाटले होते. कोट्यवधी रुपये ठेवी गोळा करून मनी मॅक्स कंपनीसह अजून दोन कंपन्यांनी सुपा येथून गाशा गुंडाळल्याने हजारो कोटी रुपयांना चुना लागण्याची शक्यता आहे.
शिर्डीत मग्रो मोअरफ ने लुटले, शेवगामध्येही तेच
एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने शिडसह अनेक जिल्ह्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल तीनशे कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला अटक झाली. या फसवणुकीत अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्याची पूंजी, काहींनी सेवानिवृत्तीची रक्कम, तर साई संस्थानच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कर्मचारी सोसायटीतून कर्ज काढून पैसे गुंतवले होते. अनेकांनी तर खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन यात गुंतवणूक केली होती. येथेही अनेक सामान्य कुटुंबाना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला. तर शेवगावमध्येही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा नावाखाली कोट्यवधी रुपये लटल्याचे याआधीच उघडकीस आले आहे.