Weather Update: राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून, रत्नागिरी येथे आज देशातील सर्वाधिक ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. किमान तापमानातही वाढ झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मात्र त्याचबरोबर हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा दिलाय. रविवार आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने म्हटलंय.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत उद्यापासून गुरुवारपर्यंत काही भागांत हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित ठिकाणी कडाक्याचं ऊन आणि शुष्क वाऱ्यांमुळे तापमानवाढीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांतही काही प्रमाणात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होणे शक्य आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि आग्नेयेकडून राहण्याची शक्यता आहे. इतर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्य व ईशान्येकडून राहील.
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ २१ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २५ अंश सेल्सिअस आहे. त्यावरून ‘ला-निना’चा प्रभाव अद्याप आहे. त्यामुळे पूर्वमोसमी व मोसमी पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार इशान्य भारतात सध्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे मेघालय, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सरकल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.