पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे स्वयंभू भगवान श्री हरेश्वर महाराज यांचा 72 वा उत्सव, भागवत पारायण आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 375 वा वैकुंठ गमन सोहळा बुधवार, दिनांक 2 एप्रिल 2025 ते गुरुवार, दिनांक 10 एप्रिल 2025 या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या उत्सवादरम्यान श्री गणपती, श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि श्री हनुमंतराय यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण द्वितीय वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. गुरुवार, दिनांक 10 एप्रिल रोजी पंढरपूर येथील चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता झाली. हा उत्सव वैकुंठवासी गुरुवर्य कोंडाजी बाबा महाराज डेरे, वेदांताचार्य तुकाराम महाराज शास्त्रीजी, पांडुरंग महाराज उंडे, तुकाराम महाराज उंडे आणि विष्णु महाराज पाटील शिंदे यांच्या आशीर्वादाने तसेच डॉ. नारायण महाराज जाधव, बजरंग महाराज कर्जुले आणि भास्कर महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात पार पडला.
उत्सव काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कर्जुले हर्या हे गाव पारनेर तालुक्यात धार्मिक अधिष्ठान असलेले गाव म्हणून प्रसिद्ध आहे. सप्ताहादरम्यान रामेश्वर महाराज भोजने, कैलास महाराज येवले, गणेश महाराज वाघमारे, जगदीश महाराज जोशी, पंडित महाराज शिरसागर, उमेश महाराज दशरथे आणि सुभाष महाराज गेठे, गुरुवर्य साधक हृदयरत्न डॉ. नारायण महाराज जाधव यांची कीर्तन सेवा पार पडली. तसेच श्रीराम नवमी निमित्त एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांची कीर्तन सेवा झाली. याशिवाय नवनाथ महाराज निकम यांनी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा अभंगांचे निरूपण केले.
कर्जुले हर्या येथील श्री हरेश्वर देवस्थान हे आता राज्यात आदर्श आणि भक्तिमय देवस्थान म्हणून ओळखले जाते. या देवस्थानला ‘क वर्ग तीर्थक्षेत्र’ म्हणून दर्जा प्राप्त झाला असून, राज्यभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. उत्सव काळात येथील आमटी महाप्रसाद परिसरात प्रसिद्ध असून, सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी उत्सवाला भेट दिली. नगर सह्याद्री चे संपादक आणि हरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव शिर्के यांच्या नेतृत्वाखाली आणि नियोजनाखाली हा उत्सव सोहळा यशस्वीपणे पार पडला. समस्त ग्रामस्थ, मुंबई-पुणे येथील मंडळी आणि श्री हरेश्वर ग्रामीण विकास ट्रस्ट, कर्जुले हरेश्वर यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि सहभागामुळे हा उत्सव तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात एक आदर्श उत्सव म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.