फेर प्रभाग रचना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश
मुंबई | नगर सह्याद्री
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे. निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला बुधवारी दिले. तसेच, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचना करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला महापालिकांची प्रभाग रचना, तसेच गट आणि गणांची फेररचना करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी लागणार आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगाने सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा, असे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला बुधवारी दिले. तसेच, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचना करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारला पालिकांची प्रभाग रचना, तसेच गट आणि गणांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्येही महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत लढती
राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीची सत्ता आहे. काही दिवसांपूव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये आले असता त्यांनीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अपवाद वगळता महायुती एकत्रित लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकाही महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्येच होणार आहेत.
प्रभाग, गट, गण रचना व आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष
सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने सरकारला नव्याने फेर प्रभाग रचना, गट व गण रचना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा प्रभाग, गट, गण रचना होणार आहे. तसेच त्यानंतर पुन्हा आरक्षण जाहीर केले जाणार आहे. महापालिकेसाठी 68 तर जिल्हा परिषदेसाठी 73 सदस्य संख्या राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. आगामी होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे प्रभाग, गट, गण रचना व आरक्षणाकडे लक्ष लागून आहे.
‘चार महिन्याथत निवडणुका घ्या’
महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र 6 मे रोजी, सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात सप्टेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुका रखडल्याचे कोर्टाच्या लक्षात आल्यानंतर कोर्टाने येत्या चार आठवड्यात निवडणुकीच्या नोटिफिकेशन्स काढण्याच्या आणि चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे येत्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.