श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील जनावरांचा आठवडे बाजार हा प्रसिद्ध आहे. परंतु तथाकथीत गोरक्षकांच्या भूमिकेमुळे बाजारला उतरती कळा लागल्याने बाजार नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे. तसेच व्यापाऱ्यांनी देखील पाठ फिरविल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
गावचे ज्येष्ठ नेते स्व. शिवराम आण्णा पाचपुते यांनी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून नगर-दौंड महामार्गावरील काष्टीतील जमीन देवून आठवडे बाजार सुरु केला. त्यानंतर माजी मंत्री बबनराव पाचपुते, स्व. सदाआण्णा पाचपुते यांनी वाढवलेला हाच बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. दर शनिवारी भरणाऱ्या बाजारात हैदराबाद, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणासह विविध राज्यातील व्यापारी जनावरे खरेदीविक्री करण्यासाठी हजरी लावतात. परंतु काही महिन्यांपासून बाजारला ग्रहण लागले आहे.
विक्रीनंतर जनावरांची वाहतूक करताना अनेक व्यापाऱ्यांना अडवले जाते, दहशत पसरवली जाते. परिणामी, कुरेशी समाजासह अनेक व्यापाऱ्यांनी या बाजारात येणेच बंद केले आहे. यामुळे आठवडे बाजारात विक्रीसाठी आणलेली भाकड जनावरे काही शेतकरी बाजारातच सोडून जाताना दिसत आहे. या जनावरांची कुत्र्यांकडून शिकार होतांना दिसते आहे. त्यांची दुर्गंधी गावात पसरत आहे, त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक करत आहे. गावाचा एकेकाळचा वैभवशाली बैल बाजार वाचवण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
सरकारने लक्ष देण्याची गरज!
शेती कामासाठी ट्रॅक्टर, थ्रेशर, रोटाव्हेटर यांसारख्या आधुनिक यंत्र सामुग्रीमुळे जनावरांची मागणी घटली आहे. त्याचा परिणाम थेट बैल बाजारावर झाला असून, बाजारातील जनावरांची मागणी घटल्याने, बैल बाजार नामशेष होत चालला आहे. तसेच भाकड जनावरे कोणीही विकत घेत नसल्यामळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.
– सुरेश गायकवाड, व्यापारी काष्टी
शेतकरी आर्थिक संकटात!
श्रीगोंदा तालुका हा बागायती शेतीसाठी ओळखला जातो. त्यामुळे येथील बहुतांश शेतकऱ्यांचा मुख्य जोडधंदा म्हणजे दूध व्यवसाय आहे. मात्र सध्या दूध दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. दूध न देणारी भाकड जनावरे शेतकऱ्यांसाठी मोठे ओझे ठरत आहेत. त्यांना घरी सांभाळणे तोट्याचे झाले आहे. हेच वासरे बाजारात विक्रीसाठी नेल्यानंतर त्यांना बाजारात कोणी घेत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.