पुणे । नगर सहयाद्री
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येईल, मुंबईबाबतचा निर्णय आम्ही एकत्रित बसून घेवू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडमध्ये विविध मुद्यांवर भाष्य केले. अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, रायगडच्या पालकमंत्रिपदावर भाष्य केलं राष्ट्रवादी आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर तयारी करते का? असं विचारलं असता अजित पवार यांनी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तयारी करतो आहे.
निवडणुका जवळ आल्या की त्याबद्दल योग्य निर्णय होईल. मागे आघाडीत काम करत असताना काँग्रेससोबत काम केलं, त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निर्णय आम्ही जिल्हा वाईज सोडत होतो. एखाद्या ठिकाणी एक पक्ष मजबूत असतो, तर दुसऱ्या जिल्ह्यात दुसरा पक्ष मजबूत असतो. कारण प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते आणि तशीच परिस्थिती आज राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये आहे.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी याबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणाले. परंतु, अशी चर्चा होत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात तयारी करणे गरजेचे आहे. निवडणुका कुठल्याही असू दे त्या कार्यकर्त्याने त्यावेळी तत्पर असणे गरजेचे आहे आणि हीच तत्परता माझ्या कार्यकर्त्यांनी दाखवावी हेच आवाहन आम्ही त्यांना केलं आहे, असं अजित पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निर्णय त्या त्या जिल्हा पातळीवर होतील. मुंबईबाबतचा निर्णय आम्ही बसून घेऊ, असं अजित पवार म्हणाले.