अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर-सोलापूर महामार्गावरील दहेगाव परिसरात मंगळवारी सायंकाळी भरधाव दुचाकी वाहनाच्या धडकेत वारकरी दतु ओगले (रा. लोखंडेवाडी, दिंडोरी, जि. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला.श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे हरिनामाचा जयघोष करीत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे १० जून रोजी प्रस्थान झाले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही पालखी सोहळ्यात हजारोंच्या संख्येने भाविक वारकरी सहभागी झाले. वारकरी दतु ओगले देखील दिंडी सोहळ्यात सामील झाले होते. २६ दिवसांच्या प्रवासाचा पालखी सोहळ्याचे रविवार दि. २२ रोजी नगर शहरात आगमन झाले होते. हरिनामाचा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात नगरकरांनी स्वागत केले. मंगळवार दि. २४ रोजी पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले.
दरम्यान, नगर-सोलापूर महामार्गावरील देहगाव परिसरात दिंडीतील वारकरी दतु ओगले रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात दुचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. धडकेनंतर वाहन चालक वाहनासह फरार झाल्याची माहिती समोर आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. वारकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.