अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
पंढरपूरकडे पायी दिंडीसाठी निघालेल्या वारकर्यांपैकी एका वृध्द वारकर्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (25 जून) दुपारी घडली. पुंडलीक गोपाळा आगवन (वय 75, रा. संवसर, ता. कोपरगाव) असे मयत वृध्दाचे नाव आहे. पुंडलीक आगवन हे कोपरगाव येथून पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकर्यांच्या दिंडीत सहभागी झाले होते.
अहिल्यानगर तालुक्यातील साकत गावाजवळ त्यांच्या छातीत वेदना व दम लागण्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यासोबत असलेले वारकरी बाळासाहेब कचरू भाकरे (रा. धामोरी, ता. कोपरगाव) व इतर सहकार्यांनी त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात मंगळवारी (24 जून) रात्री 9 वाजता दाखल केले. उपचार सुरू असतानाच, बुधवारी (25 जून) दुपारी 1.55 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. ओंकार सेंदुरकर यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. सदर माहितीवरून पोलीस अंमलदार लबडे यांनी अहवाल दिला असून, अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार खरमाळे करीत आहेत.