संगमनेर । नगर सहयाद्री:-
भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक पावसामुळे दोन्ही धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक झाली आहे. मात्र, निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने पिण्याच्या आणि शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहून निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांमधून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
मागणीचे पत्र बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना लिहिले आहे. पत्राद्वारे मागणी करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक समाधानकारक आहे. त्यामुळे नदी मार्गे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. मात्र, दुसरीकडे निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र हे पर्जन्य छायेखाली येते, त्यामुळे अद्यापही लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही. लाभक्षेत्रात शेतीसाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या कायम आहे.
हा विरोधाभास लक्षात घेता, निळवंडे धरणातील अतिरिक्त (ओव्हरफ्लो) पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीने सोडणे अत्यावश्यक आहे.या दुष्काळी पट्ट्यात आत्ताच पाणी सोडले तर ते पाणी अडवले जाईल, जिरवले जाईल आणि त्यातून बरेच क्षेत्र सिंचनाखाली येऊन वर्षभर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ डाव्या आणि उजव्या दोनही कालव्यांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.