अहिल्यानगर । नगर सहयाद्री
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कामे अर्धवट अवस्थेत आहेत. निकृष्ट कामांमुळे जागोजागी खड्डे पडलेत, नागरिक त्रस्त आहेत. शहरातील 778 रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जा तपासणारे गुणवत्ता अहवाल बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पाट रिपोर्ट तयार करून कोट्यवधींची बिले लाटत घोटाळा केल्याची तक्रार ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे सन 2023 पासून प्रशासन, सरकारकडे करत आहेत. मात्र त्याची कोणतीही दखल न घेतली गेल्यामुळे, अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठामध्ये घोटाळ्यातील दोषींवर कायदेशीर कारवाईसाठी जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.
किरण गुलाबराव काळे विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि इतर अशी ही याचिका गेल्या 22 सप्टेंबर रोजी खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील दोषींचे धाबे दणाणले आहेत. खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटका झाल्यानंतर अनेक नागरिकांनी भेट घेत या घोटाळ्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याचा आग्रह आपल्याकडे धरला. जनहित याचिका तांत्रिकदृष्ट्या मी दाखल केली असली तरी ती या शहरातील लाखो सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने दाखल केली आहे. या लढाईत मी एकटा नसून कोट्यवधी रुपयांचा कर भरणारे नगरकर रस्त्यांसाठी लढत आहे.
काळे यांनी मे 2023 पासून 14 जुलै 2025 पर्यंत सर्व स्तरांवर लेखी तक्रारी केल्या. आंदोलने केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्यावेळी तोफखाना पोलिसांनी काळे यांना आंदोलना पूवच ताब्यात घेतले. मनपा आयुक्तांच्या मान्यतेने उपायुक्त, शहर अभियंता यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनात 31 मे 2023 रोजी काळे यांच्याशी चर्चा करत दीड महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन देखील दिले. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. त्यानंतर काळे यांनी अँटी करप्शनचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे धाव घेत 28 नोव्हेंबर 2023 रोजी तक्रार दाखल केली. ढीगभर पुरावे सादर केले. तक्रारीचा पाठपुरावा केला. त्यानंतर तब्बल एक वर्षाने 07 ऑक्टोबर 2024 रोजी अहिल्यानगर अँटी करप्शनने काळे यांचा जबाब नोंदविला. मात्र त्यानंतर हे प्रकरण राजकीय दबावातून दडपले गेल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
गुन्हा घडल्याचे चौकशीत सिद्ध
किरण काळे यांच्या तक्रारीनंतर शासकीय तंत्रनिकेतनने पाच सदस्यीय समिती गठीत करून सखोल चौकशी केली. यातून धक्कादायक माहिती उघड झाली. 778 रस्त्यांच्या कामांचे गुणवत्ता अहवाल हे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, शासकीय आस्थापनेचे बनावट लेटरहेड, बनावट शिक्के वापरून तयार केल्याचे निष्पन्न झाले. मात्र पुढे मनपा, शासकीय तंत्रनिकेतनने संगनमत करत राजकीय वरदहस्तातून गुन्हा दाखल न करताच घोटाळा दडपल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.