Maharashtra Crime News: १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून आधी एका तरुणाने या मुलीवर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर लग्नाबाबत बोलायचं आहे असं म्हणत तिला घेऊन गेला. त्याठिकाणी आरोपींनी मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. या घटनेमुळे शहर हादरले आहे.
१३ वर्षीय अल्पवयीन मुलगी नववीमध्ये शिकत आहे. या तरुणीला गावातील एका तरुणाने लग्नाचे आमीष दाखवले. हा तरुण आपल्यावर खरं प्रेम करतो असं तिला वाटले होते. या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून २९ एप्रिल ते १६ जून २०२५ दरम्यान पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर १६ जूनला या तरुणाने गावात राहणाऱ्या त्याच्या दोन मित्रांसह या मुलीला शेतात घेऊन जाऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
तर घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास तुला, वडील आणि चुलत्यांना ठार मारण्याची धमकी आरोपींनी पीडितेला दिली. हा त्रास असह्य झाल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सदरची घटना धाराशिव जिल्ह्यातील एका गावात घडली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.